शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांचा नगरपंचायतीवर मोर्चा ; मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना घेराव
मुक्ताईनगर- शहरातील पाणीटंचाई बाबत वारंवार निवेदन देऊनही तत्काळ उपाययोजना न झाल्यामुळे शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिलांच्या सहभागाने नगरपंचायत कार्यालयावर सोमवारी हंडा मोर्चा काढण्यात आला. मुख्याधिकारी शाम गोसावी व नगराध्यक्ष नजमा तडवी यांना आंदोलनकर्त्यां महिलांसह शिवसेना पदाधिकार्यांनी घेराव घालून तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी लावून धरली. तब्बल एक तासाच्या चर्चेअंती मुख्याधिकार्यांनी पाच दिवसाच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन आंदोलन महिला व शिवसेना पदाधिकार्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
टक्केवारीच्या लाभासाठी उलट-सुलट कामांना प्राधान्य
शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्याचे शहर शासनाच्या हतनूर धरणात प्रकल्पासाठी विस्थापीत धरणग्रस्त शहर आहे. शहराच्या जुन्या वस्तीमधून नव्या वस्तीमध्ये स्थलांतर करताना शासनाने एक ना अनेक सार्वजनिक जीवनावश्यक सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गेल्या तीस वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात अभ्यासपूर्ण नियोजनाअभावी शहरवासीयांची आजतागायत पिण्या च्या पाण्यासाठी वणवण होत आहे. भारत निर्माण योजनेच्या नावाखाली पाच कोटी रुपये खर्च करूनही लोकप्रतिनिधी व तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना आजतागायत झालेली नाही. आज नागरीकांची अवस्था ‘नदी उशाला अन् कोरड घशाला’ अशी झाली आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा निधी नगरपंचायतीला प्राप्त झाला. शासनाच्या धोरणानुसार हा निधी अत्यावश्यक मूलभूत सेवांसाठी खर्च करणे अपेक्षित होते. पाणी प्रश्न हा मुक्ताईनगरच्या नागरीकांची तीव्र समस्या असल्याने ती आधी सोडवणे आवश्यक असताना ठेकेदारी व त्यातील टक्केवारीच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारचे अभ्यासपूर्ण नियोजन न करता फक्त कमिशनचा उगम समजून उलट-सुलट कामांना प्राधान्य देण्यात आले.
सुस्तावलेल्या प्रशासनामुळे मोर्चाची वेळ
रस्ते आधी की गटारी? असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला असताना रस्ते करण्याची घाई करून गटारीसाठी रस्ते तोडायचे असा उपक्रम सुरू आहे भूमिगत गटारी मंजूर झाल्या झाल्याची चर्चा आहे. आज रोजी झालेल्या रस्त्यांना केवळ सहा महिन्यापेक्षा आयुष्य नसल्याचे समजते म्हणून शासनाचा निधी हा केवळ गिळंकृत करण्याचा प्रकार झालेला असून आज निधी जर पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर खर्च झाला असता व व्यवस्थित आराखडा करून शहराचे शुद्धीकरण केले असते पाण्यासाठी भटकंती करावी लागली. नगरपंचायत प्रशासनातर्फे कोणतीही ठोस पावले उचलली गेल्याचे दिसून न आल्याने शिवसेनेने वारंवार लेखी निवेदन देऊन शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला परंतु येथील सुस्तावलेल्या प्रशासनाने या गंभीर बाबीकडे कायम दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेनेला महिलांच्या सहभागाचा सहभागाने हंडा मोर्चा काढावा लागला ही या पंचायतीच्या हलगर्जीपणाची पावती आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, अॅड.मनोहरजी खैरनार, माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, माजी तालुकाप्रमुख प्रमोद देशमुख, शहर प्रमुख गणेश टोंगे, गटनेते राजेंद्र हिवराळे, तालुका संघटक प्रवीण चौधरी, उपतालुकाप्रमुख बाळा भालशंकर, माजी उपसरपंच जाफर अली, शकुर जमदार, मुशीर मन्यार, सलीम खान, हारून मिस्त्री, शेख शकील, राजेंद्र तळेले, विठ्ठल तळेले, शहर संघटक वसंत भलभले, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, तालुकाप्रमुख पंकज राणे, शहर प्रमुख आकाश सापधरे, महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उपशहर संघटिका शारदा भोई, नगरसेविका सविता भलभले, ज्योत्स्ना तायडे, अनिता मराठे, ज्योती पाटील, कुसुम बाविस्कर, लता माळी, दुर्गा मराठे, मीनाताई देशमुख, शोभा शिंगोटे, सुषमा माळी, भारती गावंडे, शोभा निगडे, अलका मराठे, अनुसया मराठे, सुनीता माळी, ज्योती मालचे, कोकिळा कुंभार, ध्रुपदाबाई कोळी, उषाबाई मराठे, कलाबाई मराठे, बेबाबाई कोळी, जया सुरंगे, लता सुरंगे, रेखा कोळी, अर्चना गोरले, सुनंदा ठोके, हजरा पिंजारी, सिंधुबाई जुमळे यांच्यासह संतोष माळी, पप्पू मराठे, अफसर शहा, दीपक खुळे, मनोज मराठे, अण्णा धनगर, भोला तेजी, साहेबराव मराठे, मुकेश साहेबराव मराठे, मुकेश डवले तसेच सातशे ते आठशे महिला उपस्थित होत्या.
पाच दिवसात पाणीपुरवठ्याचे आश्वासन
संतप्त महिलांचा मोर्चा पाहता मुख्याधिकार्यांनी तत्काळ शहरातील पाणीपुरवठा पाच दिवसात सुरळीत करण्यासह 50 एचपीचा मोटर पंप तसेच शहरात सुरू असलेल्या नवीन विंधन विहिरी व जुन्या विंधन विहिरीवर पाण्याची की समस्या पाहून त्यात त्यानुसार पंप टाकण्यात येतील व संबंधित प्रभागातील तातडीचा पाणीपुरवठा हा सुरळीत करण्यात येईल आणि सध्याची टंचाईची भीषण परीस्थिती पाहता शासनाकडे पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी शाम गोसावी नगराध्यक्ष नजमा तडवी यांच्या स्वाक्षरीनिशी मोर्चेकर्यांना देण्यात आले.