हजारो विहिरी आणि बोअरवेलमधून सुरू आहे पाण्याची तस्करी

0

मुंबई । तस्करीचे अनेक प्रकार मुंबई शहराने पाहिले आहेत, पण मुंबईत चक्क पाण्याची तस्करी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान मुंबईच्याच जीवावर उठत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही तहान भागवण्यासाठी टँकर माफिया मुंबईला संकटाच्या गर्तेत घालत आहेत. रात्रंदिवस धावणार्‍या मुंबापुरीची पाण्याची तहानही तेवढीच मोठी आहे. मात्र, ही तहान भागवण्यासाठी मुंबईलाच तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. टँकर माफियांकडून सुरू असलेल्या पाण्याच्या अवैध उपशामुळे मुंबईतल्या शेकडो इमारतींवर मोठे संकट ओढवण्याचा धोका निर्माण झाला आहे.

गोरेगाव, गिरगाव, अंधेरी आणि दादरमधून चोरले जात आहे पाणी
मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या मार्गदर्शन सोसायटीत असलेल्या बोअरवेलमधून दिवसभरात 10 ते 15 टँकर पाणी उपसले जाते. त्यासाठी टँकरचालकांकडून सोसायटीला मोठी रक्कम मोजली जाते. टँकरचालकांना अवैध पाण्याची विक्री करणार्‍या इमारतींची संख्या मोठी आहे. मात्र, स्वतःचा खिसा भरण्यासाठी टँकरचालकांनी महापालिकेच्या मैदानांनाही सोडलेले नाही. गोरेगावमधल्या नाना-नानी पार्कमधल्या बोअरवेलमधून पाणी उपसताना हा टँकर कॅमेर्‍यात कैद झाला. फक्त पश्‍चिम उपनगरेच नव्हे, तर जुनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणार्‍या गिरगाव आणि दादरमध्येही पाण्याच्या अवैध उपसा सुरू आहे. मात्र, टँकरचालक असोसिएशनला त्यात काहीच गैर वाटत नाही.

पालिका अधिकार्‍यांच्या कृपाशीर्वादाशिवाय टँकर माफिया अवैध उपशाचंही धाडस करणार नाहीत. हा सगळा प्रकार वेळीच थांबवला नाही, तर मुंबईकरांची तहान मुंबईला गिळल्याशिवाय राहणार नाही.
रतन आस्वारे, मुंबई सचिव आरपीआय (ए)

दिवसभरात 80 कोटी लीटर पाणि चोरी
मुंबईत जवळपास 4 हजार खासगी टँकर आहेत. एक टँकरसाठी दिवसभरात 2 लाख लीटर पाण्याचा उपसा होतो. म्हणजे मुंबईच्या गर्भातून दिवसभरात 80 कोटी लीटर पाण्याचा उपसा होता. पाण्याचा हा अवैध उपसा मुंबईसाठी किती घातक आहे, हे तज्ज्ञांनीच स्पष्ट केले आहे. मुंबईच्या भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालल्यामुळे जुन्या इमारतींसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेच्या अपुर्‍या पाणीपुरवठा योजनेमुळे टँकर माफियांचे फावते आहे.