भुसावळ- हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 41.00 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात तब्बल 97.8 मिली पावसाची नोंद झाली. शुक्रवारी हतनूर धरणाच्या लाभ क्षेत्रातील बर्हाणपूर येथे 27.2, देडतलाईला 14.8, चिखलदरा 29.2, लखपूरी 25.6 मिली अशी एकूण 97.8 मिली पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे धरणात पाणीसाठा वाढून विसर्ग सुरू झाला तर शनिवारी धरणाचे दोन दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले. दरम्यान, उजव्या तट कालव्यातून प्रतीसेकंद 11 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असून हे पाणी यावल व चोपडा तालुक्यातील नदीपात्रात सोडून जलपुर्नभरण प्रक्रिया केली जात आहे.