‘हतनूर वेटलँड’ चे पक्षी वैविध्य जपण्याची गरज : अनिल महाजन

0

‘सेव्ह वेटलँड हतनूर’ व्याख्यानाला निसर्गप्रेमींचा प्रतिसाद

भुसावळ- भुसावळ जवळील हतनूरच्या धरणाच्या पाणथळ क्षेत्रात 25 हजारांहून अधिक पक्षी, 280 प्रजाती सापडतात त्यामुळे पाणथळ जागांसाठी जागतिक पातळीवरचा ’रामसर साईट’चा दर्जा मिळवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे तसेच हतनूर हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पक्षी निरीक्षक अनिल महाजन यांनी केले. ‘जीविधा’, ‘देवराई फाऊंडेशन‘, ‘निसर्गसेवक’ या संस्थांच्या वतीने निसर्ग अभ्यासक आणि पक्षीनिरीक्षक अनील महाजन यांच्या व्याख्यानाचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिल महाजन आणि त्यांचे सहकारी राजपालसिंग राजपूत यांचा उष:प्रभा पागे, डॉ.विनया घाटे, धनंजय शेडबाळे, राजीव पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र (राजेंद्रनगर) येथे झालेल्या व्याख्यानात अनिल महाजन यांनी 1980 च्या दशकापासून हतनूर धरणाच्या परीसरात तापी, पूर्णा नद्यांच्या संगमामुळे पाणथळ क्षेत्र तयार झाले आर्क्टिक परदेशातूनही येथे ’रेड फालोरोप’ सारखे दुर्मीळ स्थलांतरित पक्षी येऊ लागले आहेत. येथे 280 प्रकारचे पक्षी दिसू लागले असून 2012 च्या पक्षी गणनेनुसार त्यांची संख्या 25 हजार असल्याचे लक्षात आले मात्र अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैव वैविध्य धोक्यात येऊ शकते, असे सांगितले. ‘जीविधा’ संस्थेचे संचालक राजीव पंडीत यांनी प्रास्ताविक तर धनंजय शेडबाळे यांनी आभार व्यक्त केले.

अभायारण्य होणे आवश्यक
हतनूरचे जैव वैविध्य राखण्यासाठी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य होणे आवश्यक आहे. ईराणच्या ’रामसर’ पाणथळ क्षेत्राच्या धर्तीवर पक्षी जैव वैविध्य असणार्‍या पाणथळ क्षेत्रांना जागतिक संरक्षित दर्जा दिला जातो तसा दर्जा हतनूरला मिळण्यासाठी राज्य, केंद्र सरकारने प्रस्ताव करणे आवश्यक आहे मात्र राजकीय पदाधिकार्‍यांची उदासीनता असल्याने या प्रक्रियेत जनजागृती होणे गरजेचे आहे. हतनूरप्रमाणे उजनी येथेही पक्षी वैविध्य आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे तेथेही पक्षी अभयारण्य घोषित होऊ शकले नाही, अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली.

पाणथळे संरक्षीत होणे गरजेचे
जायकवाडी, वेंगुर्ला रॉक, मेहुल शिवडी, नांदूर मध्यमेश्वर (नासिक), ठाणे क्रिक, लोणार ही पाणथळे संरक्षित आहेत मात्र नवेगाव, उजनी, हतनूर सारखी पाणथळे अजून संरक्षित होऊ शकली नाहीत. यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.