मुंबई: काँग्रेसचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून लढणार असल्याची घोषणा केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत इंदापूरच्या जागेचा तिढा सुटत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आजचा दिवस ऐतिहासिक सांगतानाच तत्त्वाने काम करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं. मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे; आमच्यासारख्या तत्त्वाने वागणाऱ्या माणसांसाठी आता भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असं सांगतानाच मी कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये आलो असून भाजपशिवाय सध्याच्या काळात पर्याय नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं.