नवी दिल्ली-कॉपी वीद करणच्या टीव्ही शोमधील वक्तव्य अजूनही भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि के.एल.राहुल यांचा पिच्छा सोडत नाहीये. महिलांबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यामुळे पंड्या आणि राहुलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. सध्या ते दोन्हीही आयपीएल खेळत आहे. दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन (माजी न्यायमूर्ती) यांनी नोटीस पाठवून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
पंड्या आणि राहुल यांनी एका टीव्ही शो दरम्यान केलेल्या अश्लिल वक्त्यव्यांमुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. सोशल मीडियावर तसेच प्रसिद्धीमाध्यमांनीही त्यांना या कृत्याबद्दल धारेवर धरले. शेवटी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, पण नंतर ती मागे घेऊन लोकपालाच्या मार्फत चौकशीचा निर्णय घेतला.
गेल्याच आठवड्यात मी पंड्या आणि राहुल यांना नोटीस पाठविली आहे आणि त्यांना या चौकशीसंदर्भात हजर राहण्यास सांगितले आहे असे लोकपालांनी सांगितले आहे. जरी पंड्या आणि राहुल यांना ही नोटीस पाठविण्यात आली असली तरी सध्या इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे आणि हे दोघेही या स्पर्धेत खेळत आहेत. तेव्हा त्यांच्या फ्रँचाइझींना या चौकशीसंदर्भात कसे सांगता येईल आणि या दोघांना कसे लोकपालांसमोर उभे करता येईल, हा बीसीसीआयपुढील प्रश्न असेल. पण ११ एप्रिलला मुंबईत होणाऱ्या मुंबई इंडियन्स (पंड्या) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (राहुल) यांच्यातील सामन्याच्या निमित्ताने दोघांना चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता आहे.