राज ठाकरे LIVE: मी रंग बदलून सरकारमध्ये जाणाऱ्यांसारखा नाही; राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला !

0

मुंबई : मनसेचे आज 23 रोजी पहिले महाअधिवेशन होत आहे. सकाळी मनसेने पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचेच काय देशाचे लक्ष लागले होते. राज ठाकरे काय बोलणार? याकडे विशेष लक्ष लागले होते.

शिवसेनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केले आहे. यावरून राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. मनसेने नवीन झेंडा आणल्याने राज ठाकरे यांचा रंग बदलला असे बोलले जात आहे, मात्र मी सरकारमध्ये जाण्यासाठी रंग बदलणारा नाही असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला.

समझोता एक्स्प्रेस बंद करा

पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेल्या मुसलमानांना हाकलून लावा, त्यासाठी मोर्चा काढणार आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले. केंद्र सरकारशी त्याबाबत चर्चा ही करणार आहे असेही ठाकरे यांनी सांगितले. सगळ्यात अगोदर तर समझोता एक्स्प्रेस बंद करा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

जे मुस्लीम देशाशी प्रामाणिक ते आमचेच; राज ठाकरेंचे सीएएवरून भाष्य

केंद्र सरकारने सीएए कायदा आणला आहे. याला मनसेने पाठींबा दिला आहे. या कायद्यामुळे मुस्लिमांचे स्वतंत्र हिरावल्याचे आरोप होत आहे. यावर राज ठाकरे यांनी मनसेच्या अधिवेशनात भाष्य केले आहे. जे मुस्लीम देशाशी प्रामाणिक आहे ते आमचेच आहे असे सांगत सीएएला विरोध करणाऱ्यांना टोला लगावला.

‘हा’ झेंडा माझ्या मनातून जात नव्हता; राज ठाकरेंनी सांगितली भगवा झेंड्यामागील कल्पना !

मनसे पक्ष स्थापन केला तेंव्हा हा झेंडा माझ्या मनात होता. तो आज प्रत्यक्षात आला. शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेंव्हा भगवा झेंडाच आणला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील याच झेंड्याला स्थान होते, म्हणून आज मनसेसाठी हा झेंडा आणला असे सांगत राज ठाकरे यांनी भगवा झेंड्या मागील संकल्पना स्पष्ट केली. मनसे स्थापन केल्यापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता असे राज ठाकरे यांनी सांगितले.

पक्षाबद्दलची कुरबुर सोशल मिडीयावर लिहू नये

भाषणाची सुरुवात राज ठाकरे यांनी ‘झेंडा आवडला का?’ या प्रश्नाने केली. त्यानंतर ठाकरे यांनी पक्षातील नेते, तसेच पक्षाबद्दलची तक्रार सोशल मिडीयावर व्यक्त करू नये अशी तंबी कार्यकर्त्यांना दिली. पक्षातील नेत्यांचा, पदाचा मान राखला गेला पाहिजे. पक्षाबद्दल काही तक्रार असेल तर थेट संपर्क साधा, सोशल मिडीयावर व्यक्त झाल्यास कारवाई करेल असा इशाराही दिला. चांगली कामे करा,चांगल्या कामाबद्दल सोशल मिडीयावर लिहा असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.