हिंगोण्याच्या दाम्पत्याचा स्तुत्य निर्णय ; पोरक्या चिमुकल्यांना मिळाले पितृछत्र

0

यावल- पितृछत्र हरपल्यानंतर पोरके झालेल्या भावाच्या मुलांनाच दत्तक घेत आपला वारस म्हणून स्वीकारल्याने हिंगोण्याच्या दाम्त्याने घेतलेल्या स्तुत्य निर्णयाचे स्वागत होत आहे. त्यासाठी दत्तक विधान कार्यक्रमदेखील घेण्यात येवून कायद्यानुसार दत्तकपत्र तयार करण्यात आले. पितृछद्ध हरपल्याने बालकांना काकांचा आधार मिळाल्याने त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुकर होण्यास मदत झाली आहे.

दाम्प्त्याने समाजापुढे ठेवला आदर्श
यावल तालुक्यातील हिंगोणे येथील रहिवासी कैलास गोपाल गाजरे यांचे 2017 मध्ये निधन झाल्याने मुलगी ईश्‍वरी व मुलगा तुषार यांचे पितृछत्र हरवले. पतीच्या निधनाने सपना कैलास गाजरे यांना या दोन्ही मुलांचे पालन-पोषण करून सांभाळ करणे शक्य होत नव्हते. अशातच मुलांचे काका गुणवंत गोपाळ गाजरे व दीपाली गुणवंत गाजरे यांना अपत्य नसल्याने आयुष्यात कुणाचातरी सहारा व प्रेम मिळावे या हेतूने त्यांनी आपल्याच भावाच्या दोन्ही मुलांना दत्तक घेण्याचे ठरविले. त्यानुसार मुलांच्या आईशी चर्चा करण्यात आली.त्यांनी संमती दिल्याने दत्तक घेण्यासंदर्भात गुणवंत गाजरे व दीपाली गाजरे यांनी निर्णय घेतला. त्यानुसार बुधवार, 15 रोजी पुरोहित प्रवीण जोशी यांनी पौरोहित्य करुन शास्त्रोक्त विधी प्रमाणे दत्तक विधानाचा कार्यक्रम पार पाडला.

चिमुकल्यांचे भवितव्य झाले सुकर
मुलगी ईश्‍वरी ही चार वर्ष वयाची असून मुलगा तुषार हा तीन वर्ष वयाचा आहे. आपल्याच काका-काकुंचा आधार आई-वडील म्हणुन लाभणार असल्याने या मुलांचे भविष्य सुखकर होण्यास मदत होणार आहे. दत्तक विधान कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी गुरुवार, 16 रोजी सावदा, ता.रावेर येथे कायद्यानुसार दत्तक पत्र दुय्यम निबंधक कार्यालयात एक हजार रुपयांच्या स्टँपवर तयार करण्यात आले. त्यात मुलांची आई सपना गाजरे यांनी दत्तक वडिल गुणवंत गाजरे व दत्तक आई दीपाली गाजरे यांना आपली दोन्ही मुले दत्तक दिल्याचे लिहून दिले आहे. यासाठी साक्षीदार म्हणुन सावदा येथील वसंत पुरुषोत्तम होले व हिंगोणा येथील किसन तुकाराम बोरोले यांच्या स्वाक्षर्‍या आहे. पित्याचे छत्र हरविलेल्या मुलांना आपल्याच काकांनी आधार दिल्यामुळे मुलांना परकेपणा न वाटता आपल्याच घरात ते मनमोकळेपणे आनंदी राहु शकणार आहे. मुलांच्या पालनपोषण व सांभाळण्याची जबाबदारी घेतलेल्या गुणवंत गाजरे व दीपाली गाजरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.