नवी दिल्ली: नागरिकत्व कायद्यावरून देशात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असतांना, पाकीस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. आफ्रिदीने आपल्या ट्वीटरद्वारे टीका करत मोडी सरकारचे आता दिवस भरत असल्याचे म्हटले आहे. हिंदुत्वाच्या विचारसणीचा आता देशभरातून विरोध होताना दिसतोय. जम्मू-काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारतात आता मोदींना विरोध होतोय.असे म्हटले आहे.
पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर आसिफ गफूर यांनी केलेल्या एका ट्विटवर शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोदींची वेळ आता भरत आलीय. हिंदुत्वाच्या विचारसणीचा आता देशभरातून विरोध होताना दिसतोय. जम्मू-काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारतात आता मोदींना विरोध होतोय. भारत सरकारने नागरिकत्व कायदा लवकरात लवकर मागे घ्यावा, नाहीतर त्यांना भविष्यात याचं फळ मिळेल’, असं ट्विट शाहिद आफ्रिदीनं केलं आहे.
शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटनं आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शाहिद आफ्रिदीनं याआधीही मोदी सरकारवर ट्विटच्या माध्यमातून शरसंधान केलं होतं. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर आफ्रिदीने मोदी सरकारवर टीका केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचा आवाज दाबून टाकला जात असून निष्पापांना गोळ्या घातल्या जात असल्याचं ट्विट आफ्रिदीने केलं होतं. आफ्रिदीला याप्रकरणी ट्विटरवर जोरदार रोषाला सामोरं जावं लागलं होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरनं आफ्रिदीच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती.