हिंदू महिलांना दिलासा नाही

0

नवी दिल्ली । एकीकडे मुस्लीम समुदायातील महिला तिहेरी तलाकामुळे त्रस्त झालेल्या असताना मुस्लीम युवकांशी लग्न करणार्‍या हिंदू महिलांना त्यातून दिलासा मिळालेला नाही. मुस्लीम युवकांशी लग्न करणार्‍या हिंदू महिलांना तिहेरी तलाकाचा नियम लागू नये अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. हिंदू महिलांची तिहेरी तलाकच्या जाचातून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका विजयकुमार शुक्ला यांनी केली होती.

सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकावर सुनावणी होत असल्यामुळेे या विषयामध्ये सुनावणी करणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल आणि न्यायमूर्ती अनू मल्होत्रा यांनी सांगितले. तिहेरी तलाकच्या मुद्यावर सुनावणी करण्यासाठी विशेष खंडपीठ बनवण्यात आले आहे. त्यामुळे हे खंडपीठ जो निर्णय देईल तो सर्व महिलांना लागू होईल असे न्यायालयाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकाच्या मुद्द्यावर सुनावणी करण्याकरत पाच सदस्यीस खंडपीठ बनवले आहे. हे खंडपीठ येत्या 11 मे पासून तिहेरी तलाकच्या मुद्यावर नियमित सुनावणी घेणार आहे. कायदा सर्व महिलांना समान संरक्षण देणारा असला पाहिजे असे न्यायालयाने सांगितले. तिहेरी तलाक पद्धतीमुळेे मुस्लीम समाजात लग्न करणार्‍या हिंदू महिलांचे हाल होत आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. विशेष विवाह कायद्यातंर्गत आंतरजातीय विवाहांना नोंदणी बंधनकारक करण्याचीही मागणी त्यांनी याचिकेतून केली होती.