हुकूमशाही पध्दतीने भाजप व राज्यकर्ते काम करत आहेत – अजित पवार

0

पिंपरी-चिंचवड : हुकूमशाही पध्दतीने भाजप व राज्यकर्ते काम करत आहेत. अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. पिंपरी चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. त्यावर अजित पवार यांनी ही टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले, निवडणुका जवळ आल्या की चुनावी जुमले सुरु होतात. सूक्ष्म, लघु उद्योगाला ५९ मिनिटात एक कोटी कर्ज देणार सांगतात. हे इतकं कर्ज कसं देणार, शक्य तरी आहे का? निवडणुकीसाठी हे सर्वकाही सुरु आहे. सत्तेत आल्यानंतर म्हणणार हा चुनावी जुमला होता. सरकारने नुसता दुष्काळ जाहीर केला असून त्यासंदर्भात काहीच नियोजन केले नाही. भाजप सरकारचा भोंगळ कारभार सुरू आहे असे अजित पवार म्हणाले.

पिंपरीत नेत्यांना मंत्रीपद, महामंडळ याची आमिष दाखवली होती. पण काय मिळालं तुम्हाला दिसतंय. भाजप सरकार बनवाबनवी करत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधण्यामागे भाजपाचं राजकारण आहे. निवडणूक जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढला. समाजात धृवीकरण करायचय. निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपाला राम आठवतो. असं पवार म्हणाले.

शिवसेना थेट भाजपावर विखारी टीका करतेय तरी भाजप नेते शांत आहेत. काल झालेल्या बैठकीत ४८ जागांपैकी तीन चतुर्थांश जागांवर आघाडीचं एकमत झालंय. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. अगदी प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काही बोलले असले तरी आम्ही त्यांच्यासोबत पुन्हा चर्चेसाठी तयार आहोत असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.