हुसैनी इमारतीच्या बाजूच्या पाच इमारती तोडणार; रहिवाशांना नोटीस

0

मुंबई । हुसैनी इमारत दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून इमारतीच्या बाजूला असलेल्या जुन्या धोकादायक पाच इमारती तातडीने तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारती तातडीने रिकामी करण्यासाठी रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

भेंडी बाजारातील हुसैनी इमारत दुर्घटना घडल्यानंतर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न रणीवर आला आहे. येथील इमारती 100 वर्षाहून अधिक काळापासून दाटीवाटीने वसल्या आहेत. अत्यंत जिर्ण अवस्थेत असलेल्या या इमारती पाडण्याचा निर्णय् घेण्यात आला आहे. कोसळलेल्या हुसैनी इमारतीच्या अगदी जवळपास असणा-य चार ते पाच इमारती येत्या काही दिवसांत पाडल्या जाणार आहेत. या इमारतीतील रहिवाशांना इमारत खाली करण्याबाबतच्या नोटिसाही देण्यात आल्या आहेत. मात्र येथील रहिवाशांनी स्थलांतरास नकार दिल्याने पोलीस बळाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच येथील रहिवाशांना चुनाभट्टी संक्रमण शिबिरांत स्थलांतर केले जाणार आहे. परंतु, स्थलांतर झाल्यास मुलांच्या शाळा, कॉलेजचे काय? त्यांचे नुकसान होईल. त्यामुळे येथील रहिवाशांनी स्थलांतरास तूर्तास तरी नकार दिला असल्याची येथील एका रहिवाशांने सांगितले.

जुन्या इमारती रिकाम्या करण्याच्या हालचाली
दक्षिण मुंबईत सुमारे 14 हजार मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. यापैकी सुमारे अडीच हजार इमारतींचा लवकर पुनर्विकास करणे आवश्यक आहे. जुन्या इमारती असल्याने या इमारतीतील रहिवाशांचे त्वरीत स्थलांतरीत करण्यासाठी म्हाडाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हुसैनी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील सुमारे सव्वादोन हजार इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरीत करावे लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली.