पुण्यनगरी समुहाचे मुरलीधर शिंगोटे यांना जीवनगौरव पुरस्कार
भोसरी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने राज्यातील पत्रकारांना हेलमेट वाटप करण्याचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा पध्दतीने पत्रकारांची काळजी घेणारा हा राज्यातील एकमेव संघ आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी काम करणार्या संघटनेला आपले पुर्णपणे सहकार्य राहील. प्रसारमाध्यमांचे कितीही स्वरुप बदलले तरी पत्रकारांचे महत्व कायम आहे. मुरलीधर शिंगोटे यांनी उभा केलेला वृत्तसमुह आदर्शवत आहे, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनच्या दुसर्या सत्रात मार्गदर्शन करताना रावते बोलत होते. माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा जीवनगौरव पुरस्कार पुण्यनगरी वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे यांना यावेळी प्रदान करण्यात आला. रुपये 51 हजार, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पगडी, स्मृतिचन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. अध्यक्षस्थानी एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर होते. स्वामी समर्थ सेवा गुरुकुल पीठाचे चंद्रकांत दादा मोरे यांना यावेळी क्रांतीदुत पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, उद्योजक माणिक डावरे, सचिन लबडे यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला. प्रारंभी ‘माध्यमांचे बदलते स्वरुप’ या विषयावर आयोजीत चर्चासत्रात संपादक पुरुषोत्तम सांगळे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशीदास भोईटे, मिरर टाईम्स नाऊचे वृत्तसंपादक मंदार फणसे, संपादक अशोक सोनवणे यांनीही या चर्चासत्रात सहभाग घेतला.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, संपादक विजय बाविस्कर, पत्रकार संघाचे संस्थापक व संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, कार्याध्यक्ष वसंत मुंढे, सरचिटणीस विश्वास आरोटे, उपाध्यक्ष सोमनाथ देशकर, माजी नगरसेवक पंडीत गवळी, योगेश गवळी, संदीप भटेवरा, प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नितीन शिंदे, विदर्भ प्र्रमुख ईश्वरसिंह ठाकूर, बाळासाहेब देशमुख, अमरावती विभागीय अध्यक्ष निलेश सोमणी, पुणे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे आदी उपस्थित होते.
सेंद्रीय खताचा वापर करावा
स्वामी समर्थ सेवा गुरुकुल पीठाचे चंद्रकांत दादा मोरे म्हणाले की, हाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने क्रांतीदुत पुरस्काराने केलेला सन्मान हा सर्व समर्थ सेवेकरी व स्वामी कार्याचा आहे. मी फक्त प्रातिनिधीक स्वरुपात स्विकारलेला आहे. पत्रकार संघाने स्वामीसमर्थ मार्गाची व कार्याची दखल घेतली. कृषी क्षेत्रामध्ये रासायनिक खतांचा वापर होत असल्याने त्यामुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतकर्यांनी सेंद्रीय खताचा वापर करावा. विवाह जमवताना रक्ततपासणी करावी सल्ला त्यांनी दिला. त्र्यंबकेश्वर येथील वीस एकर जागेवर सद्गुरू चॅरिटेबल हॉस्पिटल उभे राहत आहे.
विश्वासार्हता पत्रकारांचे वैभव
यावेळी खासदार विजय दर्डा म्हणाले की, विश्वासार्हता हेच पत्रकार आणि पत्रकारितेचे वैभव आहे. बातमीत तथ्य असेल तर पत्रकाराने निर्भीडपणे मांडावे. वृत्तपत्राचे नाते वाचकांशी असायला हवे. आजची माध्यमे दबावाखाली काम करीत आहेत, असे वाटते. हे देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे पत्रकारांनी बातमीच्या माध्यमातून समाजाला सत्य तेच सांगावे. सरकार कसे चांगले आहे, हे सांगण्यासाठी पत्रकारिता नसते, काय कमतरता आहे, हे दाखविणे पत्रकाराचा धर्म आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणीशी प्रतारणा करु नये. समाजाला सत्य सांगायचे काम करावे. डिजीटल युगात मोबाईलवर बातम्या समजतात. कोणाच्या दबावाखाली येऊन सत्याची कास सोडू नये.
तंत्रज्ञान आत्मसात करावे
प्रसारमाध्यमांचे स्वरुप वेगाने बदलत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांनीही आता तंत्रज्ञानाला आत्मसात करावे. भविष्यात तंत्रज्ञान आणखी पुढे जाणार असून त्याचा आपण उपयोग करुन घ्यावा असे आवाहन संपादक राजीव खांडेकर यांनी केले.
पत्रकारांनी टेक्नोसॅव्ही व्हावे
‘प्रसार माध्यमांचे बदलते स्वरुप’ या विषयावरील परिसंवादात आपली भूमिका मांडताना ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे संपादक तुळशीदास भोईटे म्हणाले की, व्यावसायिक स्पर्धेत पत्रकारितेत बदल होत असले तरी, पत्रकारांनी मनोध्येय गमाविण्याची गरज नाही. प्रश्न उपस्थित करण्याचा पत्रकारांचा हक्क आजही अबाधित असल्याचे सांगितले. पत्रकारितेत आपण समजत आहोत, इतकेही काही वाईट दिवस आलेले नाहीत. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आजही पत्रकारच करत आहेत. जीवाची बाजी लावून आपण घोटाळेही बाहेर काढत आहोत. त्यामुळे पत्रकारिता आजही पुरेशी सक्षम असल्याचे दिसून येत आहे. पत्रकारांनी आता स्वतःला बदलविले पाहिजेत. टेक्नोसॅव्ही झाले पाहिजेत. आपल्या कामाचा वेग प्रचंड वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात आपण तंत्रकुशल झालो नाहीत, तर काळाच्या ओघात आपण बाद ठरू. जोपर्यंत आपण नैतिकतेने पत्रकारिता करत आहोत, तोपर्यंत लोकशाहीचा हा चौथास्तंभ मजबुतीनेच उभा राहील.
पत्रकारीता ढासळली आहे
संपादक पुरुषोत्तम सांगळे म्हणाले की, ज्या हेतूने पत्रकारिता करणे अपेक्षित आहे, तो हेतू आता साध्य होत नाही. या क्षेत्रात कमालीची व्यावसायिकता आली असून आपला आत्मा विकून बसलो आहोत. आजची पत्रकारिता ही मूळ उद्दिष्टापासून ढासाळली आहे. एक काळ असा होता की वृत्तपत्रे ही संपादकांच्या नावाने ओळखली जात होती. खरे तर तो पत्रकारितेचा सुवर्णकाळच होता. आजची परिस्थिती अशी आहे, की वृत्तपत्रे संपादकांच्या नावाऐवजी मालकांच्या नावाने ओळखली जात आहेत. धंदा करणे आणि मालकाला नफा कमावून देणे हेच पत्रकारांचे आणि संपादकांचे उद्दिष्ट बनले आहे. प्रबोधन करणे, माहिती देणे आणि मनोरंजन करणे ही मूळ उद्दिष्टेच आपण विसरून बसलो आहोत. जे खपते तेच विकावे लागत असून, मालकाला ‘बिझनेस’ देताना पत्रकारांना राजकारणी, आणि उद्योगपतींच्या पुढे लाळघोटावी लागत आहे, ही अत्यंत दुर्देवी अशी परिस्थिती आहे. भूमिका बनविणे आणि समाजभान जागे करण्याऐवजी आपण पेडन्यूज आणि राजकारणी मंडळींचा उदोउदो करण्यात धन्यता मानत आहोत. पतीव्रतेच्या बाजारात वेश्यांनाही पतीव्रता म्हणून खपविण्याचे पाप आजची पत्रकारिता करत आहे.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही पत्रकारांना मोलाच्या सूचना करून मार्गदर्शन केले. पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे यांनी पत्रकारांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत उहापोह केला. राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी पत्रकार संघाने केलेल्या ठरावांची माहिती दिली. सूत्रसंचालन अनिल रहाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर येथील पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.