हेलिकॉप्टर अपघातात पायलटची चुकी!

0

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेला अपघात तेव्हा चांगलाच चर्चेत राहिला होता. या अपघाताबाबत तेव्हा अनेक तर्कवितर्कही लढवले गेले होते. मात्र आता या तर्कवितर्कांना विराम मिळाला आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचा चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. या चौकशी अहवालानुसार तो अपघात पायलटच्या एका चुकीमुळे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये झालेला अपघात हा वैमानिकाने हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असतानाही टेक ऑफचा प्रयत्न केल्याने झाला असल्याचे विमान अपघात तपास पथकाने (एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) आपल्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

काय आढळले चौकशीत?
लातूर जिल्ह्यातील निलंग्यात 25 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर तब्बल 80 फुटांवरून खाली कोसळले होते. उड्डाणानंतर काही वेळातच नियंत्रण गमावल्यामुळे हेलिकॉप्टर खाली येत गेले. दरम्यान हेलिकॉप्टर विजेच्या खांबावरही आदळले होते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सुरुवातीला हेलिकॉप्टरच्या पंख्यातील बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात होतं. मात्र, चौकशी अहवालात एएआयबीने वैमानिकाची चूक असल्याचे सांगितले आहे. तसेच अपघाताच्या दिवशी लातूरमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांपेक्षा जास्त होता. जास्त तापमानामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणात अडथळा येतो. अशावेळी सुरक्षिततेसाठी हेलिकॉप्टरमध्ये कमी वजन घेऊन उड्डाण करणे अपेक्षित असते. मात्र, वैमानिकाने या स्टँटर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरकडे (एसओपी) पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळेच विमाण उड्डाणानंतर लगेच खाली कोसळल्याचे एएआयबीने आपल्या चौकशी अहवालात म्हटले आहे.

त्या पायलटचे काय होणार?
दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला, याची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या नागरी हवाई उड्डाण विभागाचे पथक निलंग्यात दाखल झाले होते. या पथकात नागरी हवाई उड्डाण विभाग मुंबईचे सहायक संचालक यशपाल यांच्या नेतृत्वाखाली प्रीतम रेड्डी व इतर पाच जणांचा समावेश होता. या पथकाने दुर्घटनाग्रस्त स्थळाची व हेलिकॉप्टरची पाहणी करून आवश्यक त्या नोंदी घेतल्या होत्या. याशिवाय, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण विभागाच्या विशेष पथकानेही या ठिकाणी चौकशी केली होती. या पथकात वरिष्ठ शास्त्रज्ञांचा समावेश होता. त्यामुळे आता चौकशी अहवालानुसार अपघाताचा ठपका ठेवण्यात आलेल्या त्या पायलटावर नेमकी कोणती कारवाई होते आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.