१० टक्के आरक्षण द्या ; जेएनयुचा इलाज करून टाकू: संजीव बालीयान

0

लखनऊ: देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन होत आहे. या कायद्याला विरोध करण्यसाठी दिल्लीतील जेएनयु आणि आणि जामिया विद्यापीठात मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. विद्यापीठातील विरोध हा राजकारणातून होत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री संजीव बालीयान यांनी केला आहे. तसेच जेएनयू आणि जामियामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी मेरठच्या कॉलेजमध्ये सीएएच्या बाजुने बसले आहेत. जर या विद्यापीठांमध्ये 10 टक्के आरक्षण दिले तर जेएनयू-एएमयूचा इलाजच करून टाकू, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी केले आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते.

पशूपालन, डेअरी आणि मत्स्य पालन राज्यमंत्री बालियान यांनी सांगितले की, पाकिस्तानातून जे शरणार्थी भारतात आले आहेत त्यापैकी आमच्याकडे आठ कुटुंबे आहेत. सीएए मंजूर होण्याआधी मलाही याबाबत माहिती नव्हती. मात्र, जेव्हा या कुटुंब प्रमुखांशी बोलणे झाले तेव्हा समजले. एका प्रमुखाने सांगितले की, पाकिस्तानात कशाप्रकारे हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्या मुलींना जबरदस्ती उचलून नेले जाते. अशा प्रकारे पिडीत कुटुंबांना जर भारतात नागरिकत्व मिळत असेल तर त्याला विरोध करत आहेत, असे बालियान म्हणाले.

बालियान यांच्या भाषणावेळी राजनाथ सिंहही व्यासपीठावर होते. त्यांच्याकडे पाहूनच ”तुम्हीच काहीतरी करू शकाल, पश्चिमी विद्यार्थ्यांसाठी जर 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-एएमयूचा इलाजच करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे.