१ जूनपासून यांत्रिक मासेमारी बंद

0

मुंबई : राज्यातील मासळी साठ्यांचे जतन आणि मच्छिमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण करण्यासाठी येत्या एक जूनपासून ३१ जुलै या कालावधीत सागरी किनारपट्टीपासून १२ मैलांपर्यंत यांत्रिकी मासेमारी नौकांना मासेमारी बंदी घालण्यात आली आहे.

पावसाळी मासेमारी बंदी ही फक्त यांत्रिकी मासेमारी करण्याऱ्या नौकांना लागू असणार आहे. पारंपरीक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. बंदीच्या कालावधीच्या दरम्यान यांत्रिकी मासेमारी नौका मासेमारी करताना अढळल्यास ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम’ अंतर्गत गलबत व पकडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहेत.

बंदी कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असल्याने मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच खराब वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. या कालावधीच्या दरम्यान ज्या संस्थांच्या यांत्रिक मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील अशा संस्थांचे पुरस्कृत केलेले अर्ज ‘राष्ट्रीय सहकार विकास निगम’ योजनेच्या लाभाकरीता विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच पावसाळी मासेमारी करताना अपघात झाल्यास यांत्रिकी मासेमारी नौकेस शासनाकडून नुकसानभरपाई मिळणार नाही. एक जूनपूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना एक जूननंतर कोणत्याही परीस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी नसून अशा नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले.