मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे आज बुधवारी 8 रोजी एकदिवसीय अधिवेशन घेण्यात आले. केवळ 20 मिनिटांत हे अधिवेशन संपले. या अधिवेशनात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती घटकासाठी आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. संसदेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आरक्षण मुदतवाढीचे विधेयक यापूर्वीच मंजूर करण्यात आले आहे. आता विधीमंडळातील या अधिवेशनात आरक्षण मुदतवाढीच्या विधेयकाच्या पाठिंब्याचा ठराव करण्यात आला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संविधान सभेतील चर्चांचा संदर्भ देऊन आरक्षणाच्या महत्त्वावर भाष्य केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणावरील मताचाही उल्लेख केला.
भारतीय संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019 संसदेत मंजूर झाले. त्यानंतर आता राज्यांकडून या विधेयकाला पाठिंबा देणारे ठराव केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राच्याही विधीमंडळाने या विधेयकाला पाठिंब्याचा ठराव संमत केला. यासाठी विधीमंडळाचं 20 मिनिटांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांचे मरठीत अभिभाषण झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करून दिला.
आपल्या अधिवेशनात राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढे जाईल आणि काम करेल असं सांगितलं. तसेच सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध राहिल, असंही नमूद केलं. यावेळी नाना पटोले यांनी आपण ओबीसींचाही विचार करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने वारंवार ओबीसींचा आकडा नक्की किती हे विचारलं. त्यामुळे ओबीसींबाबत एक प्रस्ताव आणत आहोत. त्यालाही संमती द्यावी.”