२-१ ने इंग्लंडला नमवत भारताने मालिका जिंकली

0

लंडन-भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने केलेल्या आक्रमक शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या 20-20 सामना जिंकत ३ सामन्याची मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. इंग्लंडने दिलेले १९९ धावांचे आव्हान भारताने रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केले. रोहित शर्माने ५६ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. या खेळीत रोहितने ११ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचले.

सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहितने लोकेश राहुल, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या सोबत छोटेखानी भागीदाऱ्या रचत संघाला विजय मिळवून दिला. विराट आणि हार्दिक पांड्यानेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडकडून डेव्हिड विली, जेक बॉल आणि ख्रिस जॉर्डन यांनी १-१ बळी घेतला.

या विजयासह भारताने आपल्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. यानंतर होणाऱ्या वन-डे व कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ अशीच कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गुरुवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच उलटला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत १९८ धावांचा डोंगर उभा केला.
सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली. विशेषकरुन रॉयने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत सर्वच भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. जेसन रॉयने ३१ चेंडूंमध्ये ६७ धावांची खेळी केली. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर कर्णधार मॉर्गन लवकर माघारी परतला. मात्र यानंतर प्रत्येक इंग्लिश फलंदाजाने आपल्या वाटेला आलेली जबाबदारी चोखपणे बजावत संघाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला.

आज गोलंदाजीसोबत भारतीय क्षेत्ररक्षकांनीही चांगलीच निराशा केली. हार्दिक पांड्याला सामन्यात सर्वाधिक ४ बळी मिळाले, मात्र यासाठी त्याला ३८ धावा मोजाव्या लागल्या. याव्यतिरीक्त सिद्धार्थ कौलने २ तर दिपक चहर आणि उमेश यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला.