३० लाख शेतकऱ्यांसाठी कर्जाची योजना तयार करा

0

मुंबई : राज्यातील ३० लाख शेतकरी कर्जाच्या परिघाबाहेर गेलेले आहेत. त्यांच्यासाठी कर्जाची योजना तयार करा. मागेल त्याला कर्ज देऊ अशी व्यवस्था तयार करायची, प्रत्येकाला कर्ज मिळाले पाहिजे त्यासाठी आपल्या भागात कर्ज मेळावे घ्या. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. येत्या दोन महिन्यात जलयुक्त शिवार आणि शेततळची कामे पूर्ण करा, पाण्याचे नियोजन, पिकांचे प्लॅनिंग करा यासाठी कृषिमंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अश्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय हंगामपूर्व बैठकीत दिल्या.

खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी ४० हजार कोटी शेती क्षेत्रातले उत्पन्न वाढले आहे. गेल्या १० वर्षातील रेकॉर्ड तोडला आहे. कृषी विभागाचे अभिनंदन करताना, विपरीत परिस्थितीत शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीवर इतक उत्पन्न वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे हि आभार मानले. शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेत असताना त्यांनी सहकार विभागाला सूचना दिल्या. 10 ते 12 जिल्हा बँकांचं ग्रामीण भागात जाळं मोठं आहे. त्याचा उपयोग करुन कमर्शियल बँकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या बँकांना एजंट बनवून टार्गेट पूर्ण करावेत. जिल्हा बँका डबघाईला आल्याने पीक कर्ज वाटपाचं लक्ष्य पूर्ण होत नाही. यातून मार्ग काढण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. आपल्या विभागात कोणती पीक घेतली पाहिजेत त्याचे प्लॅनिंग करा, कृषी अधिकाऱ्यांनी, विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना सल्ला आणि सूचना कराव्यात. शेतकऱ्यांची मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, त्यासाठी अविश्रांत काम करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. दुबार पेरणीची वेळ येणार नाही याचे नियोजन करा. हलक्या प्रतीच्या जमिनीत कापसाचं पीक घेऊ नका, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तुरीसारख्या पिकांसाठी यंदाच्यावर्षी शाश्वत मॉडेल तयार करु. दोन महिन्यात जलयुक्त शिवाराची कामं, मागेल त्याला शेततळं आणि विहिरीची कामे पूर्ण झाली पाहिजेत. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. मात्र वॉटर स्ट्रक्चर तयार करण्यासाठी मिशन मोडमध्ये कामं झाली पाहिजेत, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. कृषी आणि पणन विभागाने स्टोरेज आणि फूड प्रोसेसिंगसाठी जास्तीत काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

डबघाईला आलेल्या बँकांचे शिखर बँकेत विलीनीकरण करा

राज्यातील 31 बँकांपैकी 11 बँका तोट्यात असून, त्यापैकी 9 बँकांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी, बुलडाणा, वर्धा आणि नागपूर बँकांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

… तर दुष्काळाचा आराखडा तयार करा

दुष्काळाची वेळ आली तर त्याचा सामना करण्यासाठी आतापासूनच जिल्हाधिकाऱ्यांनी आराखडा तयार करून ठेवा. चारा टंचाई, पाणी कमी आले तर कुठल पाणी कमी- जास्त करायचे या सगळ्याचे नियोजन हवे त्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.