श्रीनगर: कॉंग्रेसने काल निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जम्मू-काश्मीर राज्याला लागू असलेले कलम ३७० रद्द केले जाणार नाही असे कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलेले आहे. दरम्यान आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपाने कलम 370 रद्द केले तर जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करु असा इशारा मेहबूबा मुफ्ती यांनी दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
ज्या अटींवर जम्मू काश्मीर भारताचा एक भाग बनले जर त्याच अटी काढून घेणार असाल तर आम्हाला जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करावे लागेल. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी 2020 पर्यंत जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि अनुच्छेद 35 ए रद्द करण्याची घोषणा केली त्यावर मुफ्ती यांनी हे विधान केले आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही भाष्य केलं. काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये त्यांचे सरकार आल्यास काश्मीर घाटीतील सैन्यांची उपलब्धता कमी केली जाईल तसेच AFSPA वर पुर्नविचार केला जाईल असं आश्वासन दिलं आहे मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सांगितलेल्या गोष्टीच काँग्रेसने जाहीरनाम्यात नमूद केल्याचं मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले.
कालच ओमर अब्दुल्ला यांनीही जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान असावा, अशी मागणी केली होती. तसेच जम्मू-काश्मीरच्या संरक्षणासाठी वेगळा पंतप्रधान त्या राज्याला मिळायलाच हवा, याचाही उल्लेख ओमर अब्दुल्लांनी केला होता.