राज्याचा दहावीचा निकाल ८९.४१ टक्के

0

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल यंदा ८९.४१ टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९१.९७ टक्के इतका लागला आहे. तर ८७.२७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहे. कोकण विभागाने बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल ९६ टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ८५.९७ टक्के इतका लागला.

राज्यातील सुमारे १७ लाख ४१ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन गुणपत्रिका प्रत डाऊनलोड करुन घेता येईल. गुणपत्रिकेची मूळ प्रत संबंधित शाळांमध्ये वितरीत केली जाईल.