100 मोदी, शहा आले तरी 2024 मध्ये काँग्रेसचेच सरकार
मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा; विरोधकांच्या एकजुटीवरही केले विधान
नवी दिल्ली,वृत्तसंस्था
100 मोदी,शहा आले तरी 2024 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार बनणार असल्याचा दावा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. 2 मंगळवारी नागालँडमध्ये एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधक भाजपला हटवतील. आम्ही इतर पक्षांशीही याबाबत बोलत आहोत, अन्यथा देशातील लोकशाही आणि संविधान संपुष्टात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहासारखे वागत आहेत, असेही ते म्हणाले.
मोदी अनेकदा म्हणतात की, देशाला तोंड देणारी एकमेव व्यक्ती आहे. त्यांना या देशातील अन्य कोणीही स्पर्श करू शकत नाही. तुम्ही लोकशाहीत आहात हे लक्षात ठेवा. हुकूमशहा नाही. तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे आणि ज्या लोकांनी निवडून दिले तेच तुम्हाला 2024 मध्ये धडा शिकवतील. केंद्रात आघाडीचे सरकार येणार आणि काँग्रेस त्याचे नेतृत्त्व करेल. आम्ही इतर पक्षांशी बोलत आहोत. आम्ही लोकांशी बोलत असतो, त्यांच्याशी आमच्या कल्पना शेअर करत असतो. आम्ही 2024 च्या निवडणुका कशा जिंकायच्या याबद्दल बोलत आहोत. आता भाजप बहुमतात येणार नाही. इतर पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवू. आम्ही संविधान आणि लोकशाहीसोबत जाऊ. काँग्रेसच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी प्राण दिले, भाजपने नाही. हा हिंदुस्थान आहे. आमच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिले आहेत. काँग्रेसवाल्यांनी जीव दिला. भाजपच्या लोकांनी दिलेला नाही. मला भाजपचा असा एक माणूस दाखवा जो स्वातंत्र्यासाठी लढला आणि तुरुंगात गेला, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर खरगेंनी भाजपावर हल्लाबोल केला.
स्वातंत्र्यासाठी लढणार्या गांधींची हत्या केली
जो माणूस स्वातंत्र्यासाठी लढत होता…ते महात्मा गांधी…. त्यांना या लोकांनी मारले. असे लोक देशभक्तीच्या गप्पा मारत असतात. ज्यांनी जीव घेतला तेच आम्हाला शिकवत आहेत. इंदिराजी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आपले प्राण दिले. ज्यांनी भाजपमध्ये कोणी आपला जीव दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 2014 मध्येच स्वातंत्र्य मिळाले असे त्यांना वाटते, त्यांना 1947 आठवत नाही, असेही खरगे म्हणाले.