मुंबई : गोरेगाव (पूर्व) नागरी निवारा येथील 1200 सदनिकाधारकांचा सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न अखेर शिवसेनेच्या अथक प्रयत्नाने सुटला आहे. शासनाने शासकीय अध्यादेश काढून हा प्रश्न निकाली काढला आहे. आमदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नाने येथील 1200 सदनिकाधारकांचा गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सुटला आहे.
नागरी निवारा हे व्हीएलसी कायद्याअंतर्गत बनवण्यात आलेला नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात आलेला यशस्वी गृहनिर्माण प्रकल्प आहे. येथील 1200हून अधिक सदनिकांची खरेदी-विक्री झाली होती, परंतु शासनाच्या काही अटीशर्तीमुळे सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न सुटत नव्हता. जे मूळ मालक उपलब्ध नाहीत आणि केवळ व्यवहार करून गेले आहेत त्यासाठी ही मोठी अडचण होती. याप्रकरणी आमदार प्रभू यांनी कृती समितीला बरोबर घेऊन सातत्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबरोबर या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. विधानसभेत विविध आयुधे वापरून आवाज उठवला तसेच नगरविकास खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विद्यमान उपनागर जिल्हाधिकारी बिपेंद्रसिंग कुशवाह आणि माजी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांच्यासोबत सकारात्मक बैठका घेतल्या.
यांचेही सहकार्य
खासदार गजानन कीर्तिकर, आमदार प्रभू, माजी नगरसेवक सदाशिव पाटील, विधी समिती अध्यक्ष ड. सुहास वाडकर, शाखाप्रमुख संदीप जाधव यांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. समितीच्या वतीने शैलेश पेडामकर, मनोहर जाधव, दिलीप कांबळी, गणपती राजगिरे, विजय साळसकर, संजय पालव, राजेंद्र खामकर, प्रवीण तेली, नीलेश मुणगेकर, नितीन मोहिते यांनी सातत्याने पाठपुरावा केला.