17 हजार शुभेच्छा पत्रांचे व 5 हजार चॉकलेटचे वाहनचालकांना वाटप

0

पुणे । भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (आयएमईडी) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (एनएसएस) वतीने ‘रस्ता सुरक्षा जनजागृती, स्वच्छ भारत आणि ग्रीन इंडिया अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. या अभियानातंर्गत शहरातील विविध भागातील प्रमुख 20 सिग्नलच्या ठिकाणी महाविद्यालयाच्या चारशे विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि वाहतूक सुरक्षा विषयी संदेश असलेल्या 17 हजार शुभेच्छा पत्रांचे आणि 5 हजार चॉकलेटचे वाटप केले.

यावेळी भारती विद्यापीठाचे डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ. भारतकुमार सांख्ये, डॉ विजय फाळके प्रा. मैत्रे, डॉ. ए. डी. मोरे, प्रा. एस. सी. हेमबाडे आदी उपस्थित होते. रस्ते अपघातांची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे, या पार्श्‍वभूमीवर हे जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले, अशी माहिती डॉ.सचिन वेर्णेकर यांनी दिली. या अभियानातंर्गत ‘पॉकेट शुभेच्छा पत्र’ या चार पानी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यामध्ये वाहतूक सुरक्षा याविषयी संदेश तसेच ‘ग्रीन इंडिया’ व ‘स्वच्छ भारत अभियान’ याविषयी संदेश देण्यात आले आहेत.

विविध चौकांमध्ये अभियान
हे अभियान शहरातील प्रमुख चौकांमध्ये आयोजित केले होते. यामध्ये कोथरूड डेपो, परिहार चौक (औंध), श्री दगडूशेठ गणपती, सारसबाग (महालक्ष्मी मंदीर), वारजे पूल, संतोष हॉल (आनंदनगर,सिंहगड रोड), महानगरपालिका (बालगंधर्व), बिग बाजार (हडपसर), कर्वे पुतळा (कोथरूड), कात्रज सिग्नल, गुडलक चौक, स्वारगेट, शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर सिग्नल, अभिरूची मॉल (सिंहगड रोड), एम.आय.टी. (आनंदनगर), राजाराम पूल, पद्मावती (सातारा रोड), नळ स्टॉप या चौकांचा समावेश होता. नागरिकांनी या अभियानाला चांगला प्रतिसाद दिला.