नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सुरक्षेचा मुद्दा विशेष होता. सत्ताधारी भाजपकडून प्रचारात सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा अधिक वापरला गेला तर विरोधकांनी देखील त्यांच्या काळात सर्जिकल स्ट्राईक केल्याच दावा केला. कॉंग्रेसने त्यांच्या काळात ६ वेळा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला होता. दरम्यान यावर भारतीय लष्करी दलातील कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी खुलासा केला आहे. भारतीय लष्कराने पहिल्यांदा 9 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईक केले. त्याचसोबत पुलवामा हल्ल्यानंतर बालकोटमध्ये एअर स्ट्राईककरुन दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले असे जनरल रणबीर सिंह यांनी सांगितले. २०१६ अगोदर कधीही सर्जिकल स्ट्राईक झाले नाही असे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे. श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत घेत त्यांनी हा दावा केला.
लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी केलेल्या या स्पष्टीकरणानंतर काँग्रेसच्या दाव्यावर प्रश्न उभा राहतो. तसेच मागील चार महिन्यात 86 दहशतवादांना ठार केले तर 20 दहशतवाद्यांना पकडण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे अशीही माहिती जनरल रणबीर सिंह यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये अनेकदा सर्जिकल आणि एअर स्ट्राइकचा उल्लेख केला होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कॉंग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाले होते असे सांगितले होते. त्यानंतर कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेत पक्षाचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. शुक्ला यांनी पत्रकारांना संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक नेमके कुठे आणि कधी करण्यात आली, याची तपशीलवार माहिती दिली. पूंछमधील भट्टल सेक्टर (19 जून 2018), केलमधील शारदा सेक्टर (30 ऑगस्ट-1 सप्टेंबर 2011), सावन पात्रा चेकपोस्ट (6 जानेवारी 2013), नाझपीर सेक्टर (27-28 जुलै 2013), नीलम व्हॅली (6 ऑगस्ट 2013) आणि 23 डिसेंबर 2013 रोजी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आल्याचं शुक्ला म्हणाले. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही, अशा शब्दांत शुक्ला यांनी मोदींना टोला लगावला होता.