कॉंग्रेशी विचारावर चालणाऱ्या सरकारची आणीबाणीची मनस्थिती कायम

0

मुंबई: रिपब्लिक भारत या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज बुधवारी ४ रोजी सकाळी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आली आहे. दुपारी अलिबाग कोर्टात अर्णब यांना हजर करण्यात येईल. मात्र या प्रकारावरुन भाजपाने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्णब गोस्वामीला अटक करणे म्हणजे महाराष्ट्रात आणीबाणी लागू असल्याचे दाखवून दिले आहे. ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी असल्याची टीका भाजपने केली आहे. महाराष्ट्रात माध्यमांची गळचेपी सुरु असल्याचे या सरकारने सिद्ध केल्याची टीका होत आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मंत्री आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या सरकारची आणीबाणीची मनस्थिती अजूनही कायम आहे.  मुंबईमध्ये पत्रकारितेवर जो हल्ला झाला तो निंदणीय आहे, आणीबाणीसारखी महाराष्ट्र सरकारची ही कारवाई आहे. आम्ही याचा निषेध करतो असे त्यांनी सांगितले आहे.

आमदार आशिष शेलार यांनी एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली, सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये. धिक्कार या शब्दात आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.