नंदुरबार। जिल्ह्यात 29 मे रोजी वादळीवारा, वीजा व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहावे. शेतकर्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी सांगितले. तलाठी, मंडळ अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांनी मुख्यालय सोडू नये. तालुका मुख्यालयाचा नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावा. नागरिकांनी खबरदारी घेवून कुठल्याही प्रकारची आपत्ती घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये.
खिडकीतून वीज पडतांना पाहू नका
घरातील विद्युत उपकरणे सुरु असतील तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहावे. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नये. शॉवरखाली अंघोळ करु नये. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नये. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे सुरु असतांना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेवू नये. उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नये. धातूच्या उंच मनोर्याजवळ उभे राहू नये. घरात असल्यास उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडतांना पाहू नका. विजेपासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.