ठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा

मी पॅकेज जाहीर करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे : उद्धव ठाकरे पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा : फडणवीस

मी पॅकेज जाहीर करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे : उद्धव ठाकरे
पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा : फडणवीस

कोल्हापूर : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते कोल्हापुरच्या दौऱ्यावर आहे. आज शाहुपुरीतील चौकात दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असली, तरी पूरग्रस्तांना मदत कारण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत “मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसून मदत जाहीर करणारा मुख्यमंत्री आहे”, असा टोला फडणवीसांना लगावला असताना, “पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा”, असा पलटवार फडणवीसांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचा पाहणी दौरा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांकडून केल्या जाणाऱ्या पॅकेजच्या घोषणेच्या मागणीविषयी विचारणा केली असता “मी पॅकेज जाहीर करणारा नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे”, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर लगेचच झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता फडणवीसांनी देखील लागलीच पलटवार केला. “आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

कठोर निर्णय घ्यावे लागतील : मुख्यमंत्री

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शाहुपुरीत पूरबाधितांशी आत्मियतेने संवाद साधला. घाबरू नका, काळजी करू नका, असा धीर मुख्यमंत्री पूरग्रस्तांना दिला. तसेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पुराचं भीषण वास्तव जवळून पाहिल्यानंतर त्यासंदर्भातील कामाला, आराखड्याला गती दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतीक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पूरग्रस्तांचं कर्ज माफ करा : फडणवीस

कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रवीण दरेकर आणि मी तीन दिवसांचा दौरा केला. चंद्रकांत पाटीलही आमच्या दौऱ्यात जॉईन झाले. तीन जिल्ह्यात 22 ठिकाणी आम्ही भेट देऊन संवाद साधला. दरड कोसळली, भूस्खलन झालं, घरांमध्ये पाणी गेलं अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. सामान्य माणसांच्या हालअपेष्टा अडचणी समजून घेतल्या, अशी माहिती फडणवीसांनी दिली. तसेच, आम्ही मागच्यावेळी पूरग्रस्त भागाचं कर्ज माफ केलं होतं. तसा निर्णय आता घेण्याची आवश्यकता आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या पूरग्रस्तांना सरकार 50 हजार देणार होतं, पण ही रक्कम अजून दिलेलं नाही. सरकारने ही मदत तातडीने दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
फडणवीस पुढे म्हणाले की, राज्य सरकारकडून तातडीची मदत येणं अपेक्षित होतं, पण अजून पोहोचली नाही. लोक आमच्याजवल सातत्याने 2019 च्या मदतीचा उल्लेख करत होते. आमच्या सरकारने ते दिलं होतं. आपत्ती आल्यानंतर एक काळ महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये रिस्टोरेशन करावं लागतं, त्यावेळी तात्काळ मदत आवश्यक असते. घर-दुकानांमध्ये चिखल घुसतो, ते सफाई करण्यासाठीही खर्च असतो. मिठापासून कपड्यांपर्यंत खराब झाले असतात. अंतर्वस्त्रापर्यंत आणावं लागतं. ही जी तातडीची मदत द्यावी लागते, कारण या पूरग्रस्तांकडे काहीही नसतं. आता उशीर झालाय, पण सरकारने तातडीने मदत करावी, असंही ते म्हणाले.