भुसावळ : शहरातील विजय साऊंड सर्व्हिसच्या संचालकांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. अशोक रामकृष्ण चौधरी (63, रा.कन्हाळा रोड, वैष्णवी नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. चौधरी यांच्या मृत्यूमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. चौधरी यांच्यावर पतसंस्थांचे सुमारे 20 लाखांचे कर्ज झाले होते शिवाय कोरोना काळात व्यवसायही ठप्प झाल्याने कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.
व्यावसायीकाच्या आत्महत्येने भुसावळात हळहळ
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कठीण काळ सुरू असल्याने कार्यक्रमांना बंदी असल्याने साऊंड सर्व्हिस व्यवसाय चालवणेही कठीण झाले होते. त्यातच अशोक चौधरी यांनी व्यवसायासाठी सुमारे 20 लाखांचे कर्ज काढल्यानंतर या कर्जाचे हप्ते भरणेही जिकिरीचे जात असल्याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरातच पोर्चच्या बंगळीला दोरीने त्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवली. पहाटे कुटुंब उठल्यानंतर त्यांना ही घटना दिसताच कुटूंबियांनी आक्रोश केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सायंकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत चौधरी यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना व नातवंडे असा परीवार आहे.