मोलगी। जागतिक संकटांवर मात करण्याची क्षमता आदिवासी जीवनपद्धती व संस्कृतीत आहे. याच बाबींच्या संरक्षण व संवर्धन करण्यावर आदिवासी एकता परिषद भर देत आहे. शिवाय आदिवासींना युनोकडून प्राप्त व राष्ट्रीय पातळीवरील कायदेशीर हक्कांच्या संरक्षणासाठी देखील एकता परिषदेने लढा उभारला आहे. परंतु हा वैचारिक लढा अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक घटकातील आदिवासींना एका छताखाली आणण्याचा निर्णय परिषदेतील पदाधिकार्यांनी घेतला.
आदिवासींचा गौरवशाली इतिहास, वेगळा ठसा उमटवणारा सांस्कृतिक वारसा व अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथे बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे गटनेते तथा माजी सभापती सी. के. पाडवी होते. बैठकीला जि.प. सदस्य तथा किर्तनकार प्रताप वसावे, जि.प.चे माजी सदस्य सिताराम राऊत, प्रा. भिमसिंग वळवी, एकता परिषदेचे जिल्हा सचिव अॅड. अभिजीत वसावे, करमसिंग पाडवी, नामू सोंगाड्या, पांडूरंग नाईक, सरपंच भिमसिंग पाडवी, अॅड. जयकुमार पवार, अॅड. खेमजी वसावे, जयसिंग वळवी, भिमसिंग तडवी, शिवाजी वळवी, बळीराम निकुंभ, देविदास पाडवी, विजय नाईक, चंद्रकांत सोनवणे, दीपक अहिरे, मन्साराम मालचे यांच्यासह नाशिक, शिंदखेडा व दोंडाईचा येथूनही एकता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.