मुंबई : गेले दोन दिवस सातत्याने अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत असल्याने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एक दिवसासाठी ऑनलाईन प्रवेश थांबवले आहेत. सरकारच्या अनागोंदी कारभाराचा विद्यार्थी आणि पालक यांना यामुळे मनस्ताप झाला असल्याची तीव्र भावना यामुळे सर्वत्र व्यक्त होत आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंबंधी निर्माण झालेल्या अडचणींबाबत शिक्षण मंत्री तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हि प्रवेश प्रक्रिया एक दिवस थांबवली असल्याचे सांगितले.
दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशातील काही घोळ असतील तर ते बुधवारपर्यंत दूर करण्यात येतील आणि गुरुवारपासून म्हणजेच 22 जून पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल असे तावडे उयांनी स्पष्ट केले आहे . पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावतीमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबईत दहावीच्या निकालाआधी पार्ट 1 मध्ये 30 हजार विद्यार्थ्यांचं फॉर्म भरण राहिले असेल किंवा डिप्लोमाकडे ते विद्यार्थी गेले असतात असा कयास शिक्षण मंत्र्यांनी यावेळी काढला . त्याचबरोबर पार्ट 2 चा 67,289 विद्यार्थ्यानी फॉर्म भरला आहे. मात्र नंतरच्या काळात सर्व्हर स्लो झाल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे अधिकचे 3 सर्व्हर वाढवलेत आणि बँडविड्थ वाढवण्याची सूचना दिली आहे, अशी त्यांनी यावेळी दिली. गेले दोन दिवस सर्व्हर स्लो झाल्यामुळे अनेकांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत होत्या हे शिक्षण मंत्री तावडे यांनी यावेळी मान्य केले . विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केल्याने हि अडचण आली असल्याचेही त्यांनी सांगितले . मात्र उद्या एक दिवस पूर्ण घेऊन सर्व प्रकारच्या सुधारणा करण्यास दिला आहे आणि टेक्निकल एक्सपर्ट घेऊन स्वतः तपासणी करणार असल्याचे शिक्षण मंत्री तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले .
ज्यांनी भरून अर्जाची प्रिंट काढली आहे त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही. कला आणि क्रीडा विषयातही पुर्नमुल्यांकनाची सुविधा मिळणार आहे, फेरतपासणीसाठी अर्जही करता येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली . दरम्यान गणित विषय ऐच्छिक करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाबाबतही त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले .न्यायालयाच्या निर्देशाचे आम्ही स्वागत करत असून यापूर्वी हि भूमिका मांडल्यानंतर माझ्यावर सर्वत्र टीका करण्यात आली होती. मात्र आता हे टीकाकार न्यायालयाच्या निर्देशाबाबत काय भूमिका घेतात याकडे माझेही लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले . ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषय अवघड जातात, त्यांना गणिता शिवाय करिअर करता येऊ शकतं. असे सांगत त्यांनी गणित हा विषय ऐच्छिक करण्याबाबत आपण अनुकूल असल्याचे स्पष्ट केले . तसेच तज्ञांशी चर्चा करुन न्यायालयात योग्य प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचंही तावडेंनी स्पष्ट केलं आहे. अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थी पुन्हा वेबसाइटवर अर्ज करु शकतील असंही त्यांनी सांगितले .
अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया तातडीने सुरळीत करा, पालकांचे हाल थांबवा या मागणीसाठी धनंजय मुंडे यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचीही भेट घेतली आणि त्यांना त्या संदर्भातील निवेदन दिले. सरकारच्या अनागोंदी कारभाराचा विद्यार्थी आणि पालक यांना यामुळे मनस्ताप झाला असल्याची तीव्र भावना यामुळे सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यामुळे अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंबंधी निर्माण झालेल्या अडचणींबाबत त्वरीत निर्णय घ्यावा आणि ते सुरळीत करावे अशी मागणी त्यांनी केली.