शिंदखेडा। तालुक्यात गेल्या महिन्यात झालेली गारपीट, तापी काठावरील गावांचे झालेले नुकसान याचा अहवाल कृषी विभागामार्फत आलेला आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना रब्बीचा पिक विमा मिळवून दिला जाईल. त्यासाठी पिक विमा कंपन्यांना सर्वतोपरी मदत देण्याचे सूचित केले जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यांना दिले. शिंदखेडा येथे एका खासगी कामानिमित्त तेे आले होते. स्थानिक विश्रामगृहावर त्यांनी भेट देऊन शिवसेना पदाधिकार्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, शिवसेना जिल्हा संघटक मंगेश पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, तालुकाप्रमुख गिरीश पाटील, शहर प्रमुख संतोष देसले, उपशहर प्रमुख किशोर पाटील, भाईदास पाटील, सर्जेराव पाटील, बेटावद येथील विभाग प्रमुख गणेश सोनार आदी उपस्थित होते.
नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन तक्रार करा
पिक विमा कंपनीकडे शेतकर्यांनी नुकसान भरपाईसाठी 72 तासाच्या आत ऑनलाईन तक्रार केली पाहिजे. याबाबत आता शेतकरी जागृत होऊन शिवसेना पदाधिकार्यांनी शेतकर्यांना माहिती द्यावी. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी शासन शेतकर्यांसाठी राबविलेल्या योजना शेतकर्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी, असे असे आदेश ना.दादासाहेब भुसे यांनी दिले.