जळगाव, 16: देशातील लोकांना लसीचे महत्त्व सांगण्यासाठी भारत सरकारतर्फे दरवर्षी 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो. 1995 मध्ये पोलिओविरुद्ध तोंडावाटे लसीचा पहिला डोस भारतात देण्यात आला. तेव्हापासून भारत पल्स पोलिओ कार्यक्रम पाळत आहे. या दिनाचा मुख्य हेतू म्हणजे सर्व लोकांना पोलिओविरुद्ध सशस्त्र करणे आणि जगापासून पूर्णपणे निर्मूलन करणे यासाठी जागरूक करणे आहे. 27 मार्च 2014 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशातील इतर 11 देशांसह पोलिओमुक्त देश म्हणून भारताला प्रमाणपत्र प्राप्त झाले. हे देश होते बांगलादेश, भूतान, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया, नेपाळ, श्रीलंका, तैमोर-लेस्टे आणि थायलंड. भारतात पोलिओ रुग्णांची शेवटची घटना 13 जानेवारी 2011 रोजी नोंदविली गेली.
याच अनुषंगाने गेल्या 27 फेब्रुवारी 2022 पासून पाळल्या गेलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महापालिकेतर्फे राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त आज बुधवार, दि.16 मार्च 2022 रोजी आशा वर्कर व ‘एएनएम’ यांचा महापौर दालनात यथोचित सत्कार सोहळा पार पडला. महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी संबंधित आशा वर्कर व ‘एएनएम’ यांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचितपणे सत्कार केला.