नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसचा अपघात : डाऊन मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत होणार सुरळीत !

भुसावळ : नाशिकजवळच्या लहावीत रेल्वे स्थानकाजवळ डाऊन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी ठाण मांडले असून रेल्वे रूळावरून घसरलेले 11 डबे साईडला करण्यात आले असून सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याची आशा रेल्वे सूत्रांनी वर्तवली आहे.

सिंगल लाईन कार्यान्वीत
रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असलीतरी आता सिंगल लाईन (एकेरी मार्गावरून) अप-डाऊन गाड्या चालवल्या जात असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली त्यामुळे प्रवाशांना काहीसा मनस्ताप होत असलातरी गाड्या मात्र खोळंबलेल्या नाहीत. रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून चौकशीनंतर नेमके अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे मात्र रेल्वे रूळ उखडल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गेल्या दहा वर्षातील मोठा अपघात
नोव्हेंबर 2013 मध्ये मंगला एक्स्प्रेसला घोटीजवळ अपघात दहा डबे रूळावरून घसरल्यानंतर चार प्रवासी त्यावेळी दगावले होते तर सुमारे 30 वर प्रवासी जखमी झाले होते. या अपघातानंतर रेल्वेचे किरकोळ अपघात घडले असलेतरी मोठ्या अपघाताची मात्र नोंद नव्हती मात्र नाशिकजवळच्या लहावीत जवळ रविवारी दुपारी झालेल्या अपघातानंतर गेल्या दहा वर्षातील हा सर्वात मोठा अपघात असल्याचे म्हटले जात आहे.