जळगाव : मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांना जोडणार्या 233 किमोमीटर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आठ हजार कोटी रुपयांची घोषणा केली. यात भूसंपादनासाठी 3 हजार कोटी तर रस्ते बांधकामासाठी 5 हजार कोटींचा निधी असेल. येत्या 6 महिन्यात या कामांचे भूमिपूजन करण्यात येईल, असे त्यांनी जळगावात शुक्रवारी सांगितले. जळगाव येथे महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व विकास कामांच्या शुभारंभानिमित्त केंद्रीय मंत्री गडकरी शुक्रवारी जळगाव दौर्यावर आले असता बोलत होते.
तर राज्यात पुन्हा भाजपाचीच सत्ता
गडकरी म्हणाले की, संघर्ष व प्रयत्न केल्यास राज्याची जनता पुन्हा भाजपाची सत्ता येदईल. जळगावातही जागा उपलब्ध झाल्यास ड्रायपोर्ट उभारण्यात येणार असून वर्षभरात पाच लाख कोटींची कामे पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, येणारे 2024 हे वर्ष संपण्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय महामार्ग हे अमेरिकेच्या धर्तीवर गुणवत्तापुर्वक करणार असल्याचे गडकरी म्हणाले.
तर जळगावातून दिल्ली 11 तास जाणे शक्य
भुसावळ -बडोदा महामार्ग… बडोदा- चोपडा- भुसावळ अशा महामार्गाची निर्मिती करून जळगाव जिल्ह्याला थेट दिल्ली एक्स्प्रेस महामार्गाला जोडण्याची एक योजना पुढे आली असून या योजनेचा अभ्यास करणार आहे. हा प्रकल्प झाल्यास जळगावातून थेट दिल्ली 11 तासांत जाणे शक्य होईल, असे गडकरी म्हणाले.
सेना-काँग्रेसचे नाव न घेता खोचक टिका
देशभरातील असंख्य कार्यकर्त्यांचे बलिदान व समर्पणामुळे आजचा दिवस आला आहे. कारण भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. हा काही पिता पुत्राचा किंवा माँ-बेट्याचा पक्ष नसल्याची खोचक टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना व काँग्रेसचे नाव न घेता शुक्रवारी जळगावात केली.