भेंडवळच्या भविष्यवाणीने वर्तवले हे भाकीत

जळगाव : पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत गेल्या 350 वर्षांपासून चंद्रभान वाघ यांचे वंशज अक्षय तृतीयेच्या दिवशी भेंडवळ येथे घट मांडणी करतात. त्यानुसार मंगळवार, 3 मे रोजी सायंकाळी या घटाची मांडणी करण्यात आली तर बुधवार, 4 मे रोजी भाकीत वर्तवण्यात आले त्यानुसार देशात सत्तापालट होणार नाही मात्र देशावरील आर्थिक अडचणी वाढतील शिवाय वर्षभर अवकाळी पावसाचे संकट कायम असणार आहे.

अवकाळी पावसाचे वर्षभर संकट
भेंडवळ घटमांडणीनुसार, यंदा जून महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे तर यंदाही बळीराजाला अवकाळीचा सामना करावा लागणार आहे. भेंडवळ घटमांडणीतून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे तर गेल्या दोन वर्ष सामना करत असलेल्या कोरोनाचा यंदा मात्र नायनाट होण्याची शक्यता आहे. कारण यंदा देशात रोगराई राहणार, असा अंदाज भेंडवळच्या घटमांडणीतून वर्तवण्यात आला आहे.

देशात होणार नाही सत्ता पालट
राजा कायम असणार म्हणजे देशात सत्ता पालट होणार नाही. देशाचं संरक्षण चांगलं राहील. परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असही सांगण्यात आलंय.

पिके चांगली मात्र भावाची अडचण
कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिके चांगली येतील. शेतमाला भावही चांगला मिळेल. तर वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील. देशात पीक चांगले येईल. मात्र पिकांना भाव मिळणार नाही, असा अंदाज आहे.