खजूर लागवडीच्या प्रयोगातून मिळतेय वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न

माजी मंत्री एकनाथराव खडसे उत्तम राजकारणीच नव्हे तर प्रयोगशील शेतकरीही

मुक्ताईनगर (संदीप जोगी) : सुमारे 40 वर्षांपासून राज्याच्या राजकीय पटलावर यशस्वी राजकारणी म्हणून एकनाथराव खडसे यांच्याकडे पाहिले जाते. खडसे जसे उत्तम राजकारणी आहेत तसेच अधिक प्रयोगशील शेतकरीदेखील आहेत हे त्यांनी केलेल्या विविधांगी प्रयोगातून सिद्धदेखील झाले आहे. अलिकडच्या काळात खडसेंच्या संपत्तीबाबत विरोधकांनी प्रश्‍नदेखील उपस्थित केले होते मात्र विरोधकांना आपल्या कामातून उत्तर देणार्‍या खडसे यांनी शेतीतील मिळणार्‍या उत्पन्न दाखवूनच गपगार केल्याचे दिसून येते. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पैसे मिळविता येतात, असेंसांगताना खडसे यांनी त्यांच्या खजूराच्या शेतीचं उदाहरण दिले असून त्यात वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न मिळाल्याचा दावाही खडसे यांनी केला आहे.

आवड म्हणून राबवलेला प्रयोग ठरतोय फायदेशीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केलेल्या खजूराच्या शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा दावा केला आहे. गेल्या 40 वर्षांच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी आपला वेगळाच ठसा उमटवला आहे मात्र गेल्या काही वर्षात त्यांच्यावर झालेल्या विविध आरोपानंतर त्यांना मंत्री पद सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी भाजपची कास सोडत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधले पुन्हा राजकारणात सक्रिय झाले तर अलिकडेच नाथाभाऊंनी शेतात खजूर लागवडीचा राबवलला अनोखा प्रयोग हल्ली चर्चेचा विषय ठरला आहे. आधी आवड म्हणून राबवलेला प्रयोग मात्र नाथा भाऊंसाठी आता चांगलाच फायदेशीर ठरला आहे.

एकरी मिळतेय 45 लाखांचे उत्पन्न
वर्षांच्या पूर्वी खजुराची लागवड करण्यात आली व ही लागवड करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे जमिनीची खोल नांगरट करून घेण्यात आली व त्यानंतर रोटाव्हेटर करून घेण्यात आले. यावेळी चार ट्रॉली शेणखत घातल्याचं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात याची रोे मिळत नसल्यानं अरब देशातून अरबी खजुराची टिशू कल्चर रोपे मागवण्यात आली. एका रोपांचा खर्च लागवड होईपर्यंत पाच हजार रुपयांपर्यंत आला. एका एकरात शंभर रोपे आपण लावली आहेत. लागवड केल्यानंतर तिसर्‍या वर्षी काही प्रमाणात खजुराचं उत्पादन आले होतं. शंभर रुपयांप्रमाणे जागेवरच ते विकले गेले असल्यानं मार्केटिंगची अडचण आली नाही.
यंदा चौथ्या वर्षी एका झाडाला साधारणतः तीस ते चाळीस किलो इतका माल लागला आहे. एक झाडाचे उत्पन्न प्रतिझाड शंभर रुपये किलोप्रमाणे विचार केला तरी तीन हजार रुपयांपर्यंत पडतं म्हणजेच प्रती एकर तीन लाख रुपये आणि पंधरा एकरचा विचार केला तर पंचेचाळीस लाख रुपयांचं उत्पन्न खडसे यांना खजूर शेतीमधून मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

खजूर शेतीसाठी हवे उष्ण तापमान
खजूर शेतीसाठी जमीन कोणत्याही प्रकारची असली तरी तापमान मात्र उष्ण स्वरूपाचं लागत असल्याचं खडसे सांगतात. तापमान जेवढं जास्त तेवढं खजूर उत्पादन जास्त येतं, असा अनेक शेतकर्‍यांचा अनुभव आहे. खजूर शेतीमध्ये लाखो रुपयांचें उत्पन्न येत असेल तरी सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी याचा कोट्यवधी रुपयांचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने ते याची लागवड करू शकत नाहीत.
सर्वसामान्य शेतकर्‍याला खजूर उत्पादनातून आर्थिक फायदा घेण्यासाठी सरकारनं खजूर रोपांना सबसीडी दिली पाहिजे, बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे तरच खजूर शेती सर्वसामान्य शेतकर्‍यांना परवडू शकेल, असे खडसे यांनी म्हटलं आहे.
राजकारणात आपल्या संपत्तीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र शेतीमध्ये आपण सातत्यानं नवनवीन प्रयोग केले असून त्याचाच फायदा आपल्याला झाला आहे. त्याचंच उत्तम उदाहरणं म्हणून खजूर शेतीकडे पाहता येईल, असेही खडसे म्हणाले. खजूर शेतीसोबत आपण विविध रंगाच्या बिगर बियाण्याच्या जांभूळ शेतीचाही प्रयोग यशस्वी केला आहे. आगामी काळात त्याचंही लागवड क्षेत्र वाढविणार असून सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत ते पोहोचविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचंही माजी मंत्री खडसे यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना सांगितले.