30 हजार हेक्टर्सवर दुबार पेरणीचे संकट

0

जळगाव । जिल्ह्यात मान्सुनपूर्व कापूस लागवड करण्यात आली आहे. अनेकांनी धुळ पेरणी केली असून जिल्ह्यात 1 जून ते 3 जूनदरम्यान पावसाने हजेरी लावल्याने काही शेतकर्‍यांनी पेरणी व लागवड 52 टक्के क्षेत्रांवर झाली आहे. परंतु गेल्या दोन आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास 30 हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याची माहिती कृषी अधिकारी अनिल भोकरे यांनी दिली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाअभावी न अंकुरलेल्या पेरण्या मोडल्या जात आहेत.

जिल्हाभरात आठ हेक्टरांवर पेरण्यांचे उद्दिष्ट असतांना जूनच्या पहिल्या आठवड्यात चोपडा, धरणगाव, जळगावमधील तापीकाठ व गिरणा काठावरील गावांमध्ये धूळ पेरण्याही केल्या. पण, वेळोवेळी पाऊस न पडल्याने पेरण्या व लागवड बाधीत झाली आहेत. कोरडवाहू क्षेत्रातील कापूस बाधीत 10 ते 20 हजार हेक्टरांवरील कोरडवाहू कापसाचे पीक बाधीत झाले आहे. दरम्यान, जूनच्या मध्यावधीत अनेक शेतकर्‍यांनी कोरडवाहूमध्ये कापसाची लागवड केली; पण, पावसाअभावी कापूस न अंकुरल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकर्‍यांना दुबार पेरणीचा भार सोसावा लागणार आहे. कापसासह सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग या पिकांच्या पेरणी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात काही भागात करण्यात आली. जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पारोळा, यावल, रावेरचा काही भाग, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव व एरंडोलमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. तसेच पाचोरा, चाळीसगावचा काही भाग, जामनेर या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण सुस्थितीत आहे. पाचोरा, चाळीसगावसह इतर भागात तुरळक सरीमुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. सोयाबिन या पिकाला जास्त पावसाची आवश्यकता असते. परंतु, कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन अंकुरलाच नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. यापाठोपाठ ज्वारी, उडीद, मूग या पिकांची पेरणी वाया गेली आहे. कापसाची साडेपाच लाख पाकिटे शिल्लक आहेत. सर्व बियाणे बाजारात मूबलक प्रमाणात उपलब्ध असून शेतकरी आता हवामानानुसार कोणत्या पिकांची लागवड करतो हे यावर सर्व अवलंबून असल्याचे मधुकर चौधरी यांनी सांगितले़