41 लाख कृषिपंपधारक ग्राहकांची बिले तपासून होणार दुरुस्त

0

मुंबई । राज्यातील सर्व 41 लाख शेती पंपधारक वीज ग्राहकांची वीजबिले 15 ऑगस्ट 2018 पर्यंत तपासून दुरुस्त व अचूक करण्यात येतील. त्यानंतर अचूक वीजबिलांच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना राबवण्यात येईल तसेच राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनांची वीजबिले 1.16 रुपये प्रतह युनिट या दराने भरून घेतली जातील व या सर्व उच्च दाब वीज ग्राहकांच्या बिलांमधील थकबाकी 15 ऑगस्टपर्यंत निकालात काढण्यात येईल, असे स्पष्ट आश्‍वासन मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी इरिगेशन फेडरेशनच्या धडक मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.

उपसा सिंचन योजनांना 1.16 रुपये प्रती युनिट दरानेच बिले
निर्णयामुळे राज्यातील सर्व शेतकरी वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इरिगेशन फेडरेशनच्या वतीने शेतकरी वीज ग्राहकांचा धडक मोर्चा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाचे व शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केले. शिष्टमंडळामध्ये एन. डी. पाटील यांच्यासह प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील व अरुण लाड हे सहभागी होते. या बैठकीमध्ये व चर्चेमध्ये आ. गणपतराव देशमुख, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर आदी आमदार सहभागी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दिवाकर रावते, चंद्रकात पाटील, ऊर्जा सचिव अरविंद सिंग, संजीव कुमार, अभिजित देशपांडे आदी उपस्थित होते.

वीज ग्राहकांची बिले किमान 45% ते 50% कमी होतील
शेती पंप वीजबिले तपासून दुरुस्त करण्याचा निर्णय झाल्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी वीज ग्राहकांची बिले किमान 45% ते 50% कमी होतील, असा दावा प्रताप होगाडे यांनी केला आहे तसेच गेल्या 3 वर्षांत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने 3 वेळा शेती पंप वीजदरात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी वीज ग्राहकांच्या दरात व थकबाकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी वीज ग्राहकांचे शासकीय सवलतीचे वीज दर पुढील कालावधीसाठी 15 ऑगस्टपर्यंत नव्याने निर्धारित करण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला.

इरिगेशन फेडरेशनच्या मोर्चात सर्वपक्षीयांचा सहभाग
इरिगेशन फेडरेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या सर्वपक्षीय मोर्चामध्ये राज्यातील विविध ऊपसा सिंचन योजनांबरोबरच अन्य वैयक्तिक शेती पंप धारक मोठ्या संख्येने सहभागी होते. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इ विविध पक्ष व संघटना सहभागी झालेल्या होत्या. प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा या जिल्ह्यातील 10 हजार हून अधिक शेतकरी आझाद मैदानावर सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला होता.