काश्मीरच्या कृष्णाघाटी भागातील चकमकीत दोन भारतीय सैनिकांचा मृत्यू झाल्यावर, त्यांची मुंडकी कापण्याचा अश्लाघ्य प्रकार पाकिस्तानी सेनेने केला. त्यामुळे देशभर संतापाची लाट उसळणे स्वाभाविक होते. पण, ज्यांच्या घरातले असे कोणी शहीद झाल्यावर त्यांची विटंबना झालेली आहे, त्यांच्या मनाला भेडसावणार्या यातना शब्दांत मांडता येणार्या नाहीत. कारण त्यांनी घरचा कर्तापुरुष वा एक महत्त्वाचा सदस्य गमावलेला असतो. पण असे मरण हे देशासाठी हौतात्म्य असल्याने, या दु:खावर फुंकर घातली जात असते. अवघा देश आपल्या कुटुंबाच्या सदस्याचा गौरव करतो आहे, त्यासाठी दु:खातही त्यांना एक अभिमान जाणवत असतो.
पण, जेव्हा अशा शहिदाच्या मृतदेहाची विटंबना केली जाते, तेव्हा त्या गौरवालाही कलंकित केले जात असते. म्हणूनच अशा एक शहीद जवानाच्या मुलीची प्रक्षुब्ध प्रतिक्रिया समजून घेतली पाहिजे. आपल्या पित्याचे शीर नसलेले धड अंत्यसंस्कारासाठी गावी पोहोचले, तेव्हा त्या मुलीने पाकिस्तानच्या पन्नास सैनिकांची मुंडकी कापून आणा, अशी रडवेल्या शब्दांत मागणी केली. तिचे शब्द अनेकांना अतिरेकी वा बेताल वाटतील. रागाच्या भरात उच्चारलेले वाटतील. पण अशावेळी शब्द नव्हे, तर त्यातला आशय समजून घ्यायचा असतो. तिला अशी कुणाही माणसांची मुंडकी गोळा करून, त्याची माळ गळ्यात घालून मिरवायचे नाही किंवा ती रक्तपाताला आसुसलेली मुलगी नाही. किंबहुना, पित्याच्या मृत्यूनेही तिला इतके विचलित केलेले नाही. आधुनिक सभ्यता म्हणून जे काही नागरी वा युद्धाचे नियम बनवले गेले आहेत, त्याचेही किमान पालन पाकसेनेकडून होत नाही, याची ती वेदना भडक शब्द होऊन तिच्या मुखातून बाहेर पडलेली आहे. तसे म्हटल्यास ती त्या एका मुलीच्या मनातली भावना नाही, तर देशातल्या कोट्यवधी राष्ट्रप्रेमी जनतेच्या मनातली सुप्त इच्छाच आहे. असे म्हटले की, तत्काळ अनेक शहाणे आपल्याला माणुसकीची भाषा शिकवू लागतात. पाकने कसे वागावे? हा त्यांचा विषय आहे. पण भारत हा सभ्य लोकांचा देश आहे आणि इथला समाज सुसंस्कृत आहे. म्हणूनच कितीही चिथावण्या मिळाल्या तरी आपण अतिरेकी वा अमानुष वागून चालणार नाही. असले पांडित्य लगेच सुरू होत असते.
जणू जगाचा सर्व सभ्यपणा भारतानेच पोसायचा व जोपासायचा आहे. इतरांनी कुठलीही मनमानी करावी. पाकिस्तानने काहीही करावे आणि भारताने ते निमूट सहन करावे, अशीच या तथाकथित सभ्य लोकांची अपेक्षा असते. कारण त्यांचा देश तत्त्वज्ञान व संकल्पनेत वसलेला असतो. पृथ्वीतलावर त्याची कुठलीही वास्तव भूमी नाही. साहजिकच अशा भूप्रदेशाच्या भौगोलिक सीमा वा त्यांच्या सुरक्षेसाठी शहीद होण्याशी अशा लोकांना काडीमात्र संबंध येत नाही. त्यांचे जग कागदाच्या पुरचुंडीत गुंडाळलेले असते आणि तेही तशा कागदी विश्वात रममाण झालेले असतात. साहजिकच असे लोक कधी पोलिसात भरती होत नाहीत, की लष्करात भरती होऊन देशाच्या सुरक्षेसाठी आपले सर्वस्व पणाला लावत नाहीत. त्यांच्यासाठी असे काही सैनिकी जीवन जगणारे लोक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे एक प्रकरण असते. त्यातला काल्पनिक रोमांच व वास्तविक जीवनातील हिंसाचार, याच्याशी अशा शहाण्यांना कधीच कर्तव्य नसते. म्हणूनच त्याचे चित्रण बघूनही त्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही किंवा त्यांचा भावना उचंबळून येत नाहीत. मग अशा बळी पडलेल्या शहीद जवानाच्या विटंबनेने त्यांनी विचलित होण्याचा विषय कुठून येणार? म्हणूनच असे लोक शांततेने वा वाटाघाटींनी काश्मीरचा विषय निकालात काढण्याची पोपटपंची सातत्याने करीत असतात. त्यांना त्या शहिदाच्या मुलीचे अश्रू पुसावेसे वाटत नाहीत की, तिच्या प्रक्षुब्ध मागणीतील आर्तता जाऊन भिडत नाही. पण म्हणून त्या मुलीचे शब्द पोकळ वा उत्स्फूर्त नसतात. एक गोष्ट इथे समजून घेतली पाहिजे. अशा अनेक जवानांनी आजपर्यंत देशासाठी आत्माहुती दिलेली आहे. त्यात कुठल्याही जवानाच्या व सैनिकाच्या कुटुंबाने आपल्या संसाराची वा व्यक्तिगत हानी झाल्याची तक्रार केलेली नाही. जो शहीद झाला तो देशासाठी समर्पित होण्यासाठीच सेनेत गेला होता. घरदारावर तुळशीपत्र ठेवूनच त्याने सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता, याची अशा प्रत्येक कुटुंबाला खात्री असते. म्हणूनच अशा कुठल्याही कुटुंबाने कधी अमूक इतके पाक सैनिक ठार मारा वा त्यांची मुंडकीही कापून आणा; असली मागणी केलेली नाही.
चार वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला, तेव्हा त्यात बळी पडलेल्या हवालदार हेमराजच्या पत्नीने मात्र आपल्या पतीचे बेपत्ता मुंडके बघून तशीच संतप्त मागणी केलेली होती. आता तशीच मागणी पुन्हा झालेली आहे. याचा अर्थ शहीद होणार्यांच्या आप्तस्वकीयांसह भारतीय समाजमनाचा आता कडेलोट होत चालला आहे. सीमा वा भूमिका यासाठी शस्त्र उचलणे व सूडबुद्धीने हिंसा करणे, यातली लक्ष्मणरेषा धूसर होत चालल्याची ही खूणच आहे. हळूहळू सामान्य भारतीयांमध्ये पाकिस्तानी सेना व पाक समाज यांच्याविषयी कमालीची घृणा व संताप आकारास येऊ लागला आहे, अशावेळी त्यांच्या मनातल्या सूडभावनेला समजून घेतले पाहिजे. त्यांना आपल्या शेजारी देशाविषयी राग नाही की द्वेष नाही. पण ज्याप्रकारचे खेळ पाकिस्तान करतो आहे, त्यातून केवळ सूडबुद्धी चेतवली जात आहे आणि सूडभावनेने मनाचा कब्जा घेतला, मग कसलेही तारतम्य शिल्लक उरत नाही. अशा पार्श्वभूमीवर जो कोणी पाकिस्तानशी बोलणी करावी वा वाटाघाटीने प्रश्न सोडवावे असे म्हणतो, त्याच्याही बाबतील लोकभावना विरोधात जाऊ लागते. त्याच्याकडेही भारतीय सैनिकांचा शत्रू म्हणूनच बघितले जाणार आहे. असे लोक भारतीय व बुद्धिमान असले तरी त्यांच्याकडे पाकिस्तानी हिंसेचे हस्तक म्हणूनच बघितले जाणार आहे. आज सर्वच गोष्टी इतक्या थराला गेल्या आहेत, की आता सामान्य भारतीयाला पाकिस्तान नावाचा शेजारी देश पृथ्वीतलावरून नष्ट व्हावा, असे वाटू लागले आहे. त्याचे कारण नुसता द्वेष नाही, तर अशा रोगट मानसिकतेपासून आपली सुटका करून घेण्याची अतीव इच्छा, हे त्यामागचे कारण आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशात हवे तसे वागावे आणि जगावे. भारतीयांना त्याच्याशी कर्तव्य नाही.
पण, त्यांच्या तशा जगण्याचा सातत्याने भारतीयांना त्रास होणार असेल व त्यातून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होणार असतील, तर त्याला वेसण घालणे ही भारताची गरज बनून जाते. पहिली गोष्ट म्हणजे काश्मिरात भडकलेली आग पाकिस्तानने पेटवलेली आहे. त्यात पाकचा सैनिकी हस्तक्षेप अकारण भारतीत जवानांचे बळी घेतो आहे आणि त्याचीच झळ भारतीय कुटुंबांना लागते आहे. साहजिकच हा राजकीय विषय राहिलेला नसून, हजारो सैनिक व त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या सगेसोयर्यांच्याही जगण्यातली ही समस्या बनलेली आहे. अशा काही लाख व्याकूळ लोकांचे परिचित वा मित्रसोबतीही मग विचलित होतात आणि त्या प्रत्येकाला पाकिस्तानचे तुकडे करून हा देश नेस्तनाबूत करण्याची गरज वाटू लागते. त्यातून मग मुंडकी कापून आणण्याच्या मागण्या शब्दबद्ध होत असतात. त्यातला आशय इतकाच आहे, की पाकिस्तान आता शिल्लक राहू नये. त्याच्याशी बोलणी करण्याचा विषय व वेळ संपली असून, त्याला पुरता नामशेष करायची वेळ आलेली आहे. आपल्या दिवंगत शहीद पित्याच्या अंतिम संस्कारात त्या कन्येने 50 मुंडकी कापून आणायची केलेली मागणी, त्याचेच प्रतीक आहे. एका व्यथित झालेल्या कन्येची ती मागणी नाही, की अतिशयोक्ती मागणी नाही. त्यामागे देशभरच्या सामान्य नागरिकांच्या भावनांची इच्छाशक्ती एकवटली आहे. अशी भावना जेव्हा बळावत जाते, तेव्हा देशामध्ये युद्धज्वर उसळी घायला वेळ लागत नसतो.