50 हजारांपेक्षा जास्त विट निर्मिती करायचीय तर संमती पत्र बंधनकारक!

0

विट भट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्र आवश्यक, पर्यावरण मंत्री रामदास कदम
मुंबई : राज्यात पारंपरिक विटांची निर्मिती करत असताना 50 हजारांपेक्षा जास्त विट निर्मिती करणाऱ्या विट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. मंत्रालयात महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या शिष्टमंडळाने पारंपरिक विट भट्टीसंदर्भात पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी पर्यावरण मंत्री बोलत होते. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कदम म्हणाले, एकावेळी 50 हजारापेक्षा कमी विटांची निर्मिती करत असल्यास त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक नसेल. मात्र 50 हजारापेक्षा जास्त विट भट्टी लावत असतील अशा विट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील. तसेच एकावेळी 50 हजारांची विट भट्टी लावल्यानंतर तीन दिवसांनंतरच दुसरी विट भट्टी लावण्यात यावी. विट भट्टीचे ठिकाण एक हजार लोकसंख्या असलेल्या वस्तीपासून आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून कमीत कमी 200 मीटर अंतराच्या पुढे असावे, असेही पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सांगितले.