उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर कारवाई

0

पाचोरा । स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील विविध भागात उघड्यावर शौचास बसणार्‍या 8 जणांवर बुधवारी 22 मार्च रोजी कारवाई करण्यात आली. यावेळी कारवाई झालेल्याना पोलिस स्टेशनला आणले असता नातेवाईकांनी नगर पालिका स्वच्छतेबाबतच्या सेवा व सुविधा पुरवण्यास असमर्थ असुन आगोदर सेवा सुविधा द्या नंतर कारवाई करा असा तक्रारीचा सुर काढला. तर पकडुन नगरपालिका गुडमॉर्निंग पथकाने आणलेल्या आठ जणांना पोलिसांच्या स्वाधिन करतांना दोन्ही प्रशासनात समन्वयाचा परीणाम दिसुन आल्याने तिन जण पळुन जाण्यात यशस्वी झाल्याने या योजनेचा फज्जा उडाला आहे. नगरपालिकेच्या सोई सुविधांबाबत नागरीकांमधे असलेली नाराजी या धरपकड मोहीमेमुळे समोर आली आहे. तसेच ही मोहीम राबवतांना नगरपालिका व पोलिस प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसुन असल्याचा आरोप परीसरातील नागरीकांनी केला आहे.

या पथकाने यांच्यावर केली कारवाई
आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांच्या नेतृत्वाखालिल उल्हास पाटील, अनिल पाटील, राजेंद्र पाटील, भिकन गायकवाड, सुनिल चव्हाण, विनोद सोनवणे, देविदास देहडे, अरूण गायकवाड, निळकंठ ब्राम्हणे यांच्या पथकाने कृष्णापुरी भागातील शिवराम पाटील, अनिल मराठे, भागवत जाधव, रामदास पाटील (हनुमान नगर), इश्वर अहिरे (श्रीराम नगर), दिलिप गायकवाड (बाहेरपुरा), गुलाब उस्मानअली (कुर्बान नगर) व गोकुळ पाटिल (देशमुखवाडी) यांना पकडले. त्यांना पाचोरा पोलिसात आणले गेले त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू असतांना नागरीकांनी नगरपालिका पथकाच्या कर्मचार्‍यावर तोंडसुख घेतले. आमच्या परीसरात सार्वजनिक शौचालय नाही. स्वच्छता कर्मचारी गटारी काढत नाही. अनेक भागांमधे गटारीच नाहीत आणी नगरपालिका कारवाही करत आहे. आगोदर सोई सुविधा द्या, नंतर कारवाही करा, असा वाद वाढला. त्यात पथकातील काही कर्मचारी पुढील कामास निघुन गेल्याने या 8 जणांपैकी तिघांनी पळ काढला. शेवटी 5 जणांना पोलिसांच्या ताब्यात देवून कारवाहीची पुर्तता करण्यात आली.

पोलिसात 30 जणांवर गुन्हा
पाचोरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियानाचे कार्य सुरू झाले आहे. या अभियानातील अंतिम टप्पा म्हणजे उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर गुन्हे दाखल करणे यावर भर दिला जात आहे. आजवर सुमारे 30 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आलेत. नगर पालिका प्रशासनाने शहरातिल विविध भागात उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर करडी नजर ठेवण्यासाठी महीला व पुरूषांचे पथक तयार करण्यात आले आहे. राञी उशीरा व सकाळी लवकर या पथकांची गस्त वाढली आहे. तरीही शहरातील विविध भागात नागरीकांमधे जनजागृती पाहिजे, त्या प्रमाणात झाली नाही. तर काही भागांमधे स्वच्छतेच्या नागरी सुविधा पुरवण्यास नगरपालिका प्रशासन कमकुवत पडले आहे.

मोहीम राबवतांना नगरपालिका व पोलिस प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याचा नागरीकांची ओरड
नगरपालिकेच्या सोई सुविधांबाबत नागरीकांमधे असलेली नाराजी या धरपकड मोहीमेमुळे समोर आली आहे. तसेच ही मोहीम राबवतांना नगरपालिका व पोलिस प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसुन आला. सुरुवातीला दोन्ही प्रशासनातिल अधिकारी व कर्मचारी यांच्यात उत्साह होता माञ आता फक्त दिलेल्या आदेशान्वये योजना राबवणे असेच सुरु आहे. पकडून आलेल्या त्या आठ जणांना पोलिसांनी आगोदर ताब्यात घेतले असते तर ते तीन जण पळालेच नसते. त्या तिन जणांच्या पळण्यामुळे या धरपकड कारवाहीची नागरीकांमधील भिती कमी झाली आहे. या कारवाहीत कासोदा येथुन पाचोरा येथे सासर्‍यांकडे आलेल्या जावाई व एका नातेवाईकाकडे मुक्कामाला असलेल्या पाहुण्यास पकडण्यात आल्याने पंचक्रोशितील नातलगांमधे पाचोर्यातिल नातेवाईकाकडे मुक्कामाला जाण्याबाबत चिंतीत आहेत. स्वच्छ भारत अभियान संपुर्ण पाचोरा शहरात यशस्वीपणे राबवण्यासाठी नगरपालिका प्रशासनास आपल्या कार्यप्रणालित योग्य ते बदल करणे गरजेचे आहे. तसेच नागरी सेवा सुविधा कोणत्या भागात पुरवण्यास आपण कमी पडत आहे. यंत्रणेतील तृटी शोधने, जनसहभाग वाढवणे, तसेच त्या प्रभागातील नगरसेवक, समाजसेवक यांना सक्रीय सहभाग या उपक्रमात करुन घेणे गरजेचे आहे.