कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक: पंतप्रधान मोदी

0

नवी दिल्ली: शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) हे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. राज्यसभेत या विधेयकावर जोरदार गदारोळ झाला. सभापतींचे माईक खेचण्यात आले, बिल फाडण्यापर्यंत वाद गेला. मात्र आवजी मतदानाने हे विधेयक मंजूर झाले. विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारतीय शेतकरी अनेक प्रकारच्या बंधनात अडकला होता. दलाल, मध्यस्थी यांचा सामना करावा लागत होता. संसदेत मंजूर झालेल्या या विधेयाकांमुळे या सर्वातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासह शेतकरी मजबूत होणार आहे. भारताच्या कृषी इतिहासातील आजचा मोठा दिवस आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण आवश्यक आहे. त्यामुळे मेहनती शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. ही बिले मंजूर झाल्याने शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. उत्पन्न वाढेल सोबतच चांगले परिणाम समोर येतील असेही मोदींनी सांगितले.

या विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी गदारोळ केला होता. शेतकरी आंदोलन भडकेल असा इशाराही विरोधकांनी दिला आहे. दिल्लीतील रस्त्यांवर पंजाब, हरियाणातील शेतकरी रस्त्यावर देखील उतरले आहे.