महाविकास आघाडीतील जागावाटपावरून अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले..

मुंबई : महाविकास आघाडी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लढली तर त्यांचं जागावाटप कसं होणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. अजून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार म्हणाले की, आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तुम्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल. याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे.

कर्नाटक निवडणुकीत भाजपाला वाटलं होतं की आम्हीच जिंकू. मात्र तसं घडलं नाही. लोकांनी मतदान करून काँग्रेसला निवडलं. भाजपाला वाटलंही नव्हतं की काँग्रेसच्या इतक्या जागा येतील. बजरंग दलावर बंदीची मागणी झाल्यानंतर बजरंग बली हा प्रचाराचा मुद्दा करण्यात आला. आजवर तुम्ही कधी ऐकलं होतं का? की बजरंग बली हा प्रचाराचा मुद्दा झाला आहे? लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न कर्नाटकमध्ये झाला. मात्र कर्नाटकमध्ये जनतेने दाखवून दिलं की ते काय करू शकतात, असं अजित पवार म्हणाले.