नवी दिल्ली: देशभरात लोकसभा निवडणूक सुरु आहे. सहा टप्प्यातील मतदान झाले असून शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. दरम्यान आता मतदानानंतर कोणाची सत्ता येऊन कोण पंतप्रधान होणार? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान आज सकाळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तेलगु देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. चंद्राबाबू नायडू यांनी मोदी विरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. महाघाडी स्थापन करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. चंद्रबाबू नायडू यांनी शरद पवारांशी चर्चा केली. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. चंद्राबाबूंच्या या भेटीगाठी म्हणजे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीने विशेष राज्याच्या दर्जावरुन भाजपसोबत एनडीएतून फारकत घेतली. सध्या ते यूपीएच्या नेत्यांसोबत दिसतात.
चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशातील सपा नेते अखिलेश यादव, बसपा नेत्या मायावती यांच्याही भेट घेणार आहेत. चंद्राबाबू नायडू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर लखनऊकडे रवाना झाले. तिथे ते मायावती आणि अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निकालादिवशी म्हणजेच 23 मे रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. एकंदरीत ही सर्व स्थिती पाहता विरोधकांनी निकालापूर्वीच सत्तास्थापनेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केल्याचं चित्र आहे.