धुळे/नंदुरबार/जळगाव। कृषीपंप वीजग्राहक शेतकर्यांच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानात थकीत वीजबिलातून वसूल झालेल्या 66 टक्के कृषी आकस्मिक निधीचा वापर करत जळगाव परिमंडलात पाच हजार 819 शेतकर्यांना नवीन कृषीपंप वीज जोडण्या दिल्या आहेत. वीजबिलांच्या वसुलीतून 66 टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी 33 टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर खर्च करण्यात येत आहे. या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन आपल्या गावातील विद्युत यंत्रणा सक्षम करण्यासाठी कृषिपंपाच्या थकबाकीसह चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या महा कृषी ऊर्जा अभियानात जळगाव परिमंडलात आजपर्यंत कृषीपंपांची 126 कोटी 37 लाख रुपयांची वीजबिले भरून शेतकर्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. एक गाव एक दिवस, ग्राहक मेळावे, बैठका अशा विविध उपक्रमाद्वारे कृषीपंपधारक शेतकर्यांना वीजबिल थकबाकीमुक्त अभियानात सहभागी करून घेण्यात आले आहे. महा कृषी ऊर्जा अभियानात कृषीपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत जळगाव परिमंडलातील तीन लाख 64 हजार 152 शेतकर्यांकडे पाच हजार 422 कोटी 54 लाख रुपयांची थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणकडून निर्लेखन व वीजबिल दुरुस्ती समायोजन करून शेतकर्यांकडे तीन हजार 523.30 कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च 2022 पर्यंत त्यातील 50 टक्के म्हणजे एक हजार 761 कोटी 65 लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित एक हजार 761 कोटी 65 लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत. महा कृषी ऊर्जा अभियानात सहभागी झालेल्या जळगाव परिमंडलातील एक लाख 13 हजार 749 शेतकर्यांना 504 कोटी 30 लाख रुपयांची सूट मिळालेली आहे.
महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन
जमा झालेल्या वीजबिलातून 33 टक्के रक्कम ग्रामपंचायतीअंतर्गत व 33 टक्के रक्कम ही जिल्हांतर्गत कृषी आकस्मिक निधी म्हणून वापरली जात आहे. या निधीतून नवीन वीजजोडण्या देण्यासोबतच विजेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्याची कामे केली जात आहेत. या निधीद्वारे जळगाव जिल्ह्यातील तीन हजार 440, धुळे जिल्ह्यातील एक हजार 551 तर नंदुरबार जिल्ह्यातील 828 शेतकर्यांना वीजजोडणी दिली आहे. शेतकर्यांसाठी महा कृषी ऊर्जा अभियान ही थकबाकीमुक्तीची सुवर्णसंधी आहे. या योजनेत कृषिपंपधारकांनी सहभागी होत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावातील विद्युत यंत्रणेचा विकास साधावा. ज्या शेतकर्यांनी अद्याप थकबाकी भरली नाही त्यांनी पुढे येऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव परिमंडलाच्यावतीने करण्यात येत आहे.