भोपाळ: अखेर मध्य प्रदेशातील कमलनाथ यांचे सरकार १५ महिन्यातच कोसळले आहे. कमलनाथ यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असून आज दुपारी १ वाजता राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेऊन ते राजीनामा देणार आहे. ‘एक महाराज आणि २२ लालची आमदारांमुळे माझे सरकार अल्पमतात आले’ असे सांगून त्यांनी बंडखोर आमदार आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर आरोप केले. बहुमत चाचणी पूर्वीच कमलनाथ यांनी राजीनाम्याची घोषणा केली असल्याने आता बहुमत चाचणीची आवशक्यता राहिलेली नाही. कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांची भेट घेऊन कॉंग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देऊ शकतात आणि मध्यावधी निवडणुका घेण्याची मागणी देखील करू शकतात.
भाजपकडून लोकशाच्या मुल्यांची हत्या केली गेली. गायींच्या संरक्षणासाठी एक हजार गो-शाळा बनविल्या, राज्यातील माफियागिरी बंद केली. जनतेच्या कल्याणासाठी केलेले काम भाजपला मान्य नव्हते म्हणून त्यांनी नेहमी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला असे आरोप कमलनाथ यांनी केले. १५ महिन्यात सरकारच्या काळात सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा यावेळी कमलनाथ यांनी यावेळी मांडला.
१५ महिन्यात माझ्या सरकारने शेतकऱ्यांसहित सर्वच क्षेत्रातील नागरिकांसाठी फायद्याचे निर्णय घेतले. जनादेशाचा अपमान करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही असेही कमलनाथ यांनी सांगितले.