पाटणा: जगभरात कोरोनाचे संकट आहे. भारतातही कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे. कोरोनाची लस निर्मिती करण्यात अद्याप कोणत्याही देशाला यश आलेले नाही. सर्वच देशांकडून लस विकसित करण्याचा दावा केला जात असला तरी यात यश आलेले नाही. दरम्यान कोरोना लसीचे राजकारणासाठी उपयोग होऊ लागला आहे. कोरोना सारख्या विषयाचा राजकारणासाठी उपयोग होईल असे कोणाला वाटतही नव्हते मात्र भाजपने कोरोना लसिवरून राजकारण सुरु केले आहे. भाजपने आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पाटण्यात भाजपाने संकल्प पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. “भाजपा है तो भरोसा है’ ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प’ यासह भाजपाने नवीन नाराही दिला आहे.
या जाहीरनाम्यात भाजपाने ११ मोठे संकल्प केले आणि सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. यात मोफत कोरोना लस देण्यासह रोजगार निर्मितीचे आश्वासन देण्यात आले आहे. बिहार विधानसभा निवडणूक भाजप-जेडीयू एकत्रित लढत आहे.
हे आहेत भाजपचे आश्वासन
१. बिहारच्या प्रत्येक रहिवाशांना कोरोनाची लस मोफत देणार.
२. वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर तांत्रिक शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करुन देणे.
३. एका वर्षात संपूर्ण राज्यात तीन लाख नवीन शिक्षकांची भरती होईल.
४. पुढील पिढीसाठी आयटी हब येथे पाच वर्षात पाच लाख रोजगार निर्मिती.
५. एक कोटी महिला स्वावलंबी बनवणार.
६. आरोग्य विभागात एक लाख लोकांना नोकर्या मिळतील तसेच २०२४ पर्यंत दरभंगा एम्स सुरू करणार
७. धान आणि गहू नंतर डाळींची खरेदीही एमएसपी दराने केली जाईल.
८. २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्के घर देण्याचं आश्वासन.
९. २ वर्षात १५ नवीन प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याचे वचन.
१०. गोड्या पाण्यातील माशांचे उत्पादन वाढवणार
११. शेतकरी उत्पादक संघटनेची पुरवठा साखळी तयार करणार, ज्यामुळे १० लाख रोजगार निर्माण होतील.