सेना-भाजपात संघर्षाची ठिणगी

0

मुंबई । भाजपवर सध्या चारी बाजूंनी आगपाखड सुरू झाली असून, त्यात त्यांचा मित्रपक्ष शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेना व भाजप युतीत भाजपने अनेकदा शिवसेनेशी दगाबाजी केली आहे, असा आरोप शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भाजपने जे पेरले तेच उगवणार, असे सांगून भाजपला धडा शिकवू, असेही त्यांनी म्हटले आहे. उमेदवार पळवापळवीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. यापूर्वी भाजपने शिवसेनेचे उमेदवार पळवले होते याची मुख्यमंत्र्यांना आठवण का झाली नाही, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भाजपचे मंत्री करताना आणि चिमूरची हक्काची शिवसेनेची जागा पळवताना भाजपला युतीच्या धर्माची आठवण का झाली नाही? शिवसेनेने आता स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका जाहीर केली असून श्रीनिवास वनगा हे भाजप नेत्यांच्या वागणुकीबाबत वेदना व्यक्त करत स्वत:हून मातोश्रीवर आले. भाजपने जे पेरले तेच आता उगवत असून, दिवस बदलू लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

पालघर लोकसभा मतदारसंघावरून आता शिवसेना-भाजप यांच्यात ठिणगी पडली आहे. गेली साडेतीन वर्षे एकमेकांवर शाब्दिक वार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुरघोड्या करण्याच्या राजकारणाची परिणती आता पोटनिवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकण्यात झाली आहे.

उमेदवार पळवले तेव्हा युतीचा धर्म कोठे होता?
श्रीनिवास वनगा शिवसेनेत आल्यामुळे भाजपला मिरच्या झोंबलेल्या दिसतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर इतके भांबावले होते की ते सतत स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्याऐवजी ‘स्वर्गीय विष्णू सावरा’असेच म्हणत राहिले. कर्नाटकमध्येही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तेथील काँग्रेस सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे सरकार भ्रष्ट असल्याचे सांगत होते. यापूर्वी भाजपने शिवसेनेचे उमेदवार पळवले होते याची मुख्यमंत्र्यांना आठवण का झाली नाही, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भाजपचे मंत्री करताना आणि चिमूरची हक्काची शिवसेनेची जागा पळवताना भाजपला युतीच्या धर्माची आठवण का झाली नाही?
-संजय राऊत, शिवसेना खासदार.

शिवसेनेचे हे वागणे बरे नाही
भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होणार्‍या पोटनिवडणुकीबाबत सेनेचे राजकारण दुर्दैवी आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत सेनेबरोबर चर्चा झाली होती. त्यांना सर्व गोष्टींची कल्पना दिल्यानंतर त्यांनी असे वागावे हे चांगले झाले नाही.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

भाजपची दगाबाजीची मोठी जंत्री
मुख्यमंत्री फडणवीस आज सांगत आहेत की शिवसेनेचे वागणे दुर्दैवी आहे. मग राधेसुता, शिवसेनेचे उमेदवार पळवताना तुझा धर्म कुठे गेला, असा सवाल शिवसेनेने केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेचे नगरसेवक नाना अंबोले तसेच मुलुंडमध्ये प्रभाकर शिंदे यांना भाजपची उमेदवारी देताना आपले वागणे चुकले, असे मुख्यमंत्र्यांना का वाटले नाही. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राजेंद्र पटणी यांना फितवून भाजपच्या प्रचाराला जुंपले तेव्हा मुख्यमंत्र्यांचे वागणे हे सत्याच्या धर्माला धरून होते का, असा सवालही शिवसेनेने केला आहे. मुळात ज्या चिंतामण वनगा यांनी काँगे्रसच्या राजेंद्र गावित यांचा पराभव केला त्यांनाच वनगा यांच्या जागी उमेदवारी देण्याची वेळ भाजपवर का आली याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच द्यावे, असेही शिवसेनेने सुनावले आहे. शिवसेनेने केलेल्या या पलटवारामुळे भाजपची आता चांगलीच गोची झाली आहे.