बंगळूर-कर्नाटकात भाजपाला ६०-६५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा दावा विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असा दावाही त्यांनी केला. मतदानाच्या दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा नेते बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर चांगलाच तोंडसुख घेतला आहे. येडियुरप्पा यांच्या २२४ पैकी १५० जागा जिंकण्याच्या दाव्याबद्दल विचारले असता सिद्धरामय्या म्हणाले कि, येडियुरप्पा यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते मानसिक दृष्टया अस्थिर झाले आहेत.
कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान झाले आहे. भाजपाकडून येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या दहा दिवसात राज्यात झंझावती प्रचार करत २० सभांना संबोधित केले. निवडणूक आयोगाने बंगळुरुच्या राजेश्वरी नगर आणि आणखी एका मतदारसंघातील मतदान पुढे ढकलले आहे.
राजेश्वरी नगरमध्ये १० हजार बोगस मतदार ओळखपत्रे सापडली होती तर एका मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या निधनामुळे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. तीन दिवसांनी येत्या १५ मे रोजी मतमोजणी होईल. कर्नाटकातील निवडणूक आयोगाचे सदिच्छा दूत राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.